आमचं पूर्वीसारखे हप्ते घेणारं सरकार नाही; मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरेंवर सडकून टीका
कोल्हापूर : आमचं हप्ते जमा करणारं सरकार असून पूर्वीसारखं हप्ते घेणारं सरकार नसल्याची खोचक टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांच्यावर केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते जमा करण्यात आले आहेत. त्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे सरकारचा दाखला देत सडकून टीका केली. ते कोल्हापुरातील आयोजित मेळाव्यात बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते सरकारकडून महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. आम्ही एवढ्यावरच थांबणार नाही. ही योजना १५०० रुपयांवरच थांबणार नाही. राज्याची अर्थव्यवस्था मजबूत होईल, तेव्हा १५०० रुपयांचे ३ हजार होतील, कारण आम्ही देणारे आहोत, घेणारे नाहीत. ही देना बॅंक आहे लेना नाही. ज्यांनी कधी दिलं नाही त्यांना कधी कळणार, काही लोकं टिंगल करतात, वेडे खुळे काहीही म्हणताहेत, पैसे आल्यावर म्हणतात की लवकर पैसे काढा त्यांचं बरोबर आहे, दोन हफ्ते आम्ही महिलांच्या खात्यात टाकले आहेत, पूर्वीसारखं हप्ते घेणारं हे सरकार नाही, अशी सडकून टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
तसेच कोरोना काळात विरोधकांनी पुणे, मुंबईत काय काय केलंय, जिथं तिथं मिळेल तिथल्या रुग्णांच्या नातेवाईंकांच्या तोंडाचा घास काढून घेतला. आनंदाचा शिधा योजनेतही विरोधकांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला, त्यासाठीही कोर्टात गेले मात्र, त्यांचं अपील कोर्टाने फेटाळून लावलं अन् बहीणींचा विजय झाला. आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकलीयं. लोकसभेतही खोटं नरेटिव्ह पसवून त्यांनी लोकांची दिशाभूल केली काही लोकांची मते मिळवली पण माणूस एकदाच फसतो, या योजनेत खोडा घातला तर योजना रद्द होईल असं त्यांना वाटलं, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
दरम्यान, जे सोन्याचा चमचा घेऊन जे जन्माला आले आहेत. त्यांना या पैशांचं महत्व कळणार नाही पण गरीबांना माहिती आहे. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले बाजूला जाऊ द्या, पण जनतेला सोन्याचे दिवस आणण्याचे काम आम्हाला करायचंय, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.