श्री स्वामी समर्थांनी अंतःकरण शुद्धीला ‘गोमूत्र’ म्हटले आहे. शरीरातील टाकाऊ विषारी द्रव्ये जशी मूत्ररूपाने बाहेर टाकली जातात, तसेच आपल्या इंद्रियांना पडलेले कुवळण, निर्माण झालेले दोषही प्रयत्नपूर्वक काढून टाकावयाचे असतात. या प्रक्रियेला ‘गोमूत्र’ म्हणावयाचे, असा गूढ अर्थ येथे आहे. म्हणून श्री स्वामी समर्थांनी मूळव्याधीवर अर्थपूर्ण आणि बोधप्रद असा उपाय येथे सांगितला आहे. ‘गोमूत्र ध्यावे म्हणजे व्याधी जाईल.’
समर्थ कृपा – विलास खानोलकर
नारायण परशुराम सोलापूरकर हे व्यवसायाने वकील होते. श्री स्वामी समर्थ त्यास ‘गणपती’ म्हणून हाका मारीत. श्री स्वामी समर्थ चरणी त्यांची निष्ठा होती. त्यांना ‘मूळव्याधीचा’ आजार झाला. पुष्कळ वैद्य-डॉक्टर झाले; पण गुण येईना. एकदा नाइलाजास्तव त्यांनी डॉक्टरांकडून मूळव्याधीचे मोड कापले. त्यामुळे रक्तस्राव होऊ लागला. या दुखण्याने ते पूर्वीपेक्षाही अधिक बेजार झाले. दिवसेंदिवस त्यास जास्त अशक्तपणा येऊ लागला. घरातल्या घरातही त्यांना फिरवेना.
तेव्हा त्यांनी ही सर्व हकिकत अक्कलकोट येथे असलेल्या मोरोपंत सेवेकऱ्यास लिहून कळविली. त्यास श्री स्वामी समर्थ महाराजांस त्यावर औषध विचारावे, असेही लिहिले. त्याप्रमाणे मोरोपंतांनी श्री स्वामींस विचारले असता ‘गोमूत्र घ्यावे म्हणजे व्याधी जाईल’ असे सांगितले. त्याप्रमाणे नारायणरावांनी उपचार करताच ते निखालस बरे झाले.
या लीलाकथेतील नारायण सोलापूरकर हे तुमच्या आमच्यासारखे सामान्य मनुष्य आहेत. व्यवसायाने ते वकील आहेत. व्यवसायाचा भाग म्हणून ते युक्त्या-प्रयुक्त्या करणारच. पण, श्री स्वामींप्रती त्यांची निष्ठा होती, हे निश्चित. या लीलेतून खोलवर बोध घेण्याचा अथवा शोधण्याचा प्रयत्न केल्यास, पेशाने वकील असलेल्या नारायणरावांचा युक्ती-प्रयुक्तीने येणारा पैसा ‘सदोष’ असणार, असा अतिरिक्त सदोष पैसा अनेकदा सुख-समाधान-शांती नाहीशी करतो, हिरावून घेतो. हीच नारायणराव वकिलाची ‘मूळव्याधी’ म्हणता येईल. श्री स्वामी महाराज त्यास ‘गणपती’ म्हणून हाक मारीत, गणपती ही बुद्धीची देवता असल्याचे सर्वमान्य आहे; परंतु पेशाने वकील बुद्धी करामत कसरत करून मिळविलेला अतिरिक्त पैसा त्यामुळे त्यांचे सारेच बिघडलेले.
श्री स्वामी समर्थांनी अंतःकरण शुद्धीला ‘गोमूत्र’ म्हटले आहे. शरीरातील टाकाऊ विषारी द्रव्ये जशी बाहेर टाकली जातात, तसेच आपल्या इंद्रियांना पडलेले कुवळण, निर्माण झालेले दोषही प्रयत्नपूर्वक काढून टाकावयाचे असतात. या प्रक्रियेला ‘गोमूत्र’ म्हणावयाचे, असा गूढ अर्थ येथे आहे. म्हणून श्री स्वामी समर्थांनी मूळव्याधीवर अर्थपूर्ण आणि बोधप्रद असा उपाय येथे सांगितला आहे. ‘गोमूत्र ध्यावे म्हणजे व्याधी जाईल.’
‘शारीरिक रोग’ बरा करण्यापेक्षाही वृत्ती प्रवृत्तीतल्या व्याधी बऱ्या करणे केव्हाही चांगले. ते केले म्हणजे व्याधी जातील. ते स्वामी सेवेतून, स्वामी कृपेने आपोआप होत असते. काया-वाचा-मनाची शुद्धी, आचार-विचारांची शुद्धी, निर्मोही निर्लेप मन आणि काम-क्रोध-लोभ-मोह-मत्सर-माया या षड्रिपू विरहित अवस्थेनेच मूळव्याधी निखालस बरी होते. मानसिक स्वास्थ्य लाभते, तदनंतर नारायण वकील स्वामी भक्तीने सुखी झाले.