तिरुअनंतपुरम : मुंबईहून केरळला (Keral) जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात आज बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर केरळच्या तिरुअनंतपुरम विमानतळावर इमर्जन्सी घोषित करण्यात आली.
यासंदर्भातील माहितीनुसार एअर इंडिया फ्लाईटने आज पहाटे ५ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास १३५ प्रवाशांसह केरळसाठी उड्डाण केले. नियोजित वेळापत्रकानुसार हे विमान सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी केरळच्या तिरुअनंतपुरम विमानतळावर लँड होणार होते. दरम्यान फ्लाइटच्या वैमानिकाने विमानतळाच्या हवाई वाहतूक नियंत्रणाला बॉम्ब असल्याची माहिती दिली होती. यानंतरच तिरुअनंतपुरम विमानतळावर इमर्जन्सी जाहीर करण्यात आली.
बॉम्बच्या धमकीमुळे हे विमान निर्धारित वेळेच्या आधीच विमानतळावर आणण्यात आले. या विमानातील सर्व १३५ प्रवाशांना सुखरूप खाली उतरवून विमान आयसोलेशनमध्ये नेण्यात आले. तेथे विमानाची कसून तपासणी करण्यात आली. दरम्यान, विमानाच्या वैमानिकाला फ्लाईटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती कशी मिळाली..? यासंदर्भात एअर इंडिया, विमानतळ प्रशासन किंवा एटीसी कडून अधिकृत माहिती मिळू शकली नाही.