आमदार नीतेश राणे यांचा उल्हासनगरमधील हिंदूंना दिलासा
उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये हिंदू मुलीच्या मुस्लिम धर्मांतराविरोधात हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात आमदार नितेश राणे (Nitesh Rane) सहभागी झाले होते. मोर्चापूर्वी त्यांनी धर्मांतर झालेल्या मुलीच्या कुटुंबीयांचीही भेट घेत त्यांची कहाणी ऐकली. या मुलीच्या कुटुंबीयांना पोलिसांनी वेळीच सहकार्य न केल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला. यानंतर उल्हासनगरच्या तहसीलदार कार्यालयापर्यंत हा हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यानंतर बोलताना नितेश राणे यांनी ‘उनका अली, हमारा बजरंग बली’ अशी घोषणा देत भाषण केले.
जोपर्यंत यांच्या घरात लव्ह जिहाद होत नाही, तोपर्यंत यांना झळ बसणार नाही, असे म्हणत भाजपा आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. तसेच तुम्हाला बिर्याणीवाले वाचवायला येणार नाहीत आणि आम्ही काही सरकारमधून जात नाही हे लक्षात ठेवा, असे म्हणत त्यांनी पोलिसांनाही थेट इशारा दिला.
‘उल्हासनगरच्या एकेका घरात ४०-४० बांगलादेशी आणि रोहिंगे राहात असून ते कुणाच्या परवानगीने इथे राहत आहेत?’ असा सवाल नितेश राणे यांनी केला. त्यांच्यावर पोलीस कारवाई करत नसल्यामुळे ‘तुम्ही आम्हाला फक्त २४ तास द्या, या २४ तासात या सर्वांना इथून साफ करून टाकू’ असा आव्हान त्यांनी दिले. तसेच ‘आम्ही काही सरकारमधून जात नाही. तुमचे जे काही आहे, ते आमच्याच हातात आहे. तुम्हाला हे बिर्याणीवाले वाचवायला येणार नाहीत, असे म्हणत त्यांनी पोलिसांना इशारा दिला. तसेच ‘हा मोर्चा झाल्यानंतर कार्यकर्त्यांविरोधात जर गुन्हे दाखल केले, तर पोलीस स्टेशनला येऊन तांडव करेन’, असेही वक्तव्य नितेश राणे यांनी यावेळी केले.
यानंतर उल्हासनगरच्या तहसीलदारांची भेट घेत आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांनी दिले. तसेच या सगळ्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.