मुंबई: भारतीय क्रिकेट संघात आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर काही बदल झाले आहेत. राहुल द्रविडच्या जागी नवे कोच गौतम गंभीर आले आहेत आणि नव्या युगाची सुरूवात झाली. रोहित शर्माने टी-२० वर्ल्डकपमधून निवृत्तीची घोषणा केली. सूर्यकुमार यादवला हार्दिक पांड्या असताना संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. आता त्याचे पुनरागमन कसोटी संघात होणार असल्याची चर्चा आहे. बांग्लादेश आणि न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मालिकेत सूर्य यादवला संघात स्थान दिले जाऊ शकते.
मिडिया रिपोर्टनुसार टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवचे पुनरागमन कसोटीत होत आहे. भारताला घरच्या मैदानावर बांग्लादेश आणि न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. सूर्यकुमार यादवला निवड समिती संधी देऊ शकते. पुढील महिन्यापासून बांगलादेशविरुद्ध मालिका खेळवली जाईल. तर न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला १६ ऑक्टोबरपासून सुरूवात होईल.
सूर्यकुमार यादव बूची बाबू स्पर्धेत मुंबईकडून खेळत आहे. मुंबईला ग्रुप सीमध्ये ठेवण्यात आले आहे. याचे नेतृत्व सरफराज खानकडे आहे. चार दिवसांच्या फॉरमॅटमध्ये खेळवल्या जाणाऱ्या फर्स्ट क्लास सामन्यात सूर्या आपली तयारी दाखवेल. यानंतर तो दलीप ट्रॉफीमध्येही खेळताना दिसेल.