तुमचा अर्ज बाद तर झाला नाही ना? जाणून घ्या…
मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) या बहुचर्चित योजनेचा पहिला हप्ता आता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जवळजवळ ४८ लाख महिलांना याचा लाभ मिळाला आहे. परंतु अद्याप काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. यामागे नेमकं काय कारण आहे, हे आपण जाणून घेणार आहोत. तीन प्रमुख कारणांमुळे काही महिलांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत, ती कारणे जाणून घेऊ या…
या योजनेत पात्र महिलांना दोन महिन्यांचे एकूण ३००० रुपये असा पहिला हप्ता मिळत आहे. सरकारने दिलेल्या शब्दाप्रमाणे रक्षाबंधनाच्या आधीच पैसे जमा झाल्यामुळे महिला खुश झाल्या आहेत. आतापर्यंत राज्य सरकारने तब्बल ८० लाख महिलांच्या बँक खात्यात सन्मान निधी हस्तांतरित केला आहे. दरम्यान, या योजनेसाठी कोट्यवधी अर्ज आलेले आहेत. पण यातील लाखो महिलांचे अर्ज बाद झाले आहेत तर काही महिलांना अद्याप सन्मान निधी मिळालेला नाही.
ही आहेत प्रमुख तीन कारणे :-
१) राज्य सरकारने पात्र महिलांच्या खात्यावर १७ ऑगस्टपर्यंत पैसे पाठवून देऊ, असे आश्वासन दिले आहे. त्याची सुरुवात १४ ऑगस्टपासून करण्यात आली. आज १५ ऑगस्ट रोजी साधारण ४८ लाख महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवण्यात आले आहेत. १७ ऑगस्टपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यावर पैसे जमा होतील. त्यामुळे ज्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नसतील त्यांना १७ ऑगस्टपर्यंत वाट पाहावी लागेल.
२) बँकेत पैसे जमा न होण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण हे बँक सिडिंग स्टेटस आहे. बँक खाते आधार नंबरशी लिंक नसलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. १७ तारखेपर्यंत पैसे हवे असतील तर महिलांनी बँक खात्याशी आधार नंबर लिंक करणे गरजेचे आहे. आपला आधार नंबर बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तपासणे गरजेचे आहे. UIDAI च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन याविषयीची माहिती जाणून घेता येते. या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत.
३) तुम्ही अर्ज दाखल करूनही तुमच्या बँक खात्यावर पैसे आले नसतील तर घाबरण्याचे कारण नाही. तुमचा अर्ज फेटाळण्यात आल्यास तुम्हाला बँक खात्यावर पैसे येणार नाहीत. पण तुमच्या अर्जासमोर पेंडिग, रिव्ह्यू (Review), डिसअप्रूव्ह (Disapproved), असं दिसत असेल तर घाबरण्याचं कारण नाही. तुमच्या अर्जाची छाननी होत आहे. त्यामुळेच तुमच्या बँक खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. तुमचा अर्ज पात्र ठरवला गेला असूनही पैसे आलेले नसतील तर तुम्ही १७ तारखेपर्यंत वाट पाहायला हवी. १७ तारखेपर्यंत तुम्हाला पैसे मिळू शकतात.