दोन आरोपी अटकेत
मुंबई : मुंबईच्या वर्सोवा बीचवर झोपेत असताना एका वेगवान एसयूव्हीने दोघांना चिरडले. यामध्ये एका ३६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर वर्सोवा पोलिसांनी नागपूरहून आलेला कोरिओग्राफर आणि इव्हेंट ऑर्गनायझरला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक गणेश यादव आणि बबलू श्रीवास्तव हे दोघे मित्र वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर झोपले होते. तेव्हा हा अपघात घडला. ही घटना १२ ऑगस्टच्या पहाटे घडली.
बबलू श्रीवास्तवच्या डोक्यावर आणि हातावर जोरदार दणका बसल्यानंतर त्याला जाग आली. तेव्हा त्याने पाहिले की, शेजारी झोपलेल्या गणेशला चिरडून कार त्याच्या अंगावरून पुढे गेली, असे बबलूने पोलिसांना सांगितले.
या घटनेत बबलूच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली असून तो त्यानंतर बेशुद्ध पडला होता.
अपघात घडल्यानंतर कारमधील दोघेजण खाली उतरले. परंतु, यादव गंभीर जखमी झाल्याचे व प्रतिसाद देत नसल्याचे पाहून आणि घटनास्थळी लोक जमा होऊ लागल्याने त्यांनी त्यांच्या कारमधून घटनास्थळावरून पळ काढला, असे पोलीस म्हणाले.
कोरिओग्राफर असलेला निखिल जावडे, हा अपघात घडला त्यावेळी कार चालवत होता. यावेळी त्याच्यासोबत कारमध्ये त्याचा मित्र शुभम डोंगरे हा देखिल होता. दरम्यान पोलिसांनी या दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे.
गणेश यादव हा वर्सोवा येथील सागर कुटीर येथे राहत होता. रविवारी रात्री खूप उकाडा जाणवत असल्याने गणेश आणि त्याचा मित्र बबलू श्रीवास्तव वर्सोवा बीचवर झोपायला गेले.
सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास एमएच-३२-एफई-३०३३ क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या एसयूव्हीने समुद्रकिनाऱ्यावर झोपलेल्या गणेश आणि त्याचा मित्र बबलू या दोघांना चिरडले. यात गणेशचा मृत्यू झाला, तर त्याचा साथीदार बबलू जखमी झाला.