कामास विलंब; सप्टेंबर २०२४ मध्ये काम पूर्ण होणे अपेक्षित
मुंबई : मुंबई-नाशिक महामार्गावरील वडपे ते ठाणे दरम्यानच्या २३ किमीच्या महामार्गाच्या वाहतूक कोंडीला आणि खड्ड्यांना त्रासलेल्या प्रवाशांची आता यातून मे २०२५ मध्ये सुटका होणार आहे. वडपे ते ठाणे दरम्यानच्या महामार्गाच्या आठ पदरीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) सुरु आहे.
सप्टेंबर २०२४ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र या कामास विलंब झाला असून आतापर्यंत केवळ ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ हा एकूण १४२ किमीचा महामार्ग आहे. या रस्त्याच्या ११८.२० किमीच्या आठपदरीकरण आणि काँक्रीटकरणाचे काम राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) केले जात आहे. तर वडपे ते ठाणे अशा २३.८०० किमीच्या महामार्गाचे काम एमएसआरडीसीकडून सुरु आहे. एमएसआरडीसीकडून मे. एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हल्पर्सच्या माध्यमातून सप्टेंबर २०२२ मध्ये ११८२ कोटी ८७ लाख रुपये खर्चाच्या कामाला सुरुवात केली आहे.
करारानुसार हे काम सप्टेंबर २०२४ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र या कामास विलंब झाला आहे. कामामुळे मागील दोन वर्षांपासून प्रवाशी,वाहनचालकांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. अशात आता पावसाळ्यात हा महामार्ग खड्ड्यात गेला आहे. संपूर्ण महामार्गावर खड्डे असल्याने वाहतूक कोंडीत आणखी वाढ होत असून प्रवाशांना, वाहनचालकांना तासनतास वाहतूक कोंडीत अडकून रहावे लागत आहे.वडपे ते ठाणे दरम्यानच्या २५ ते ३० मिनिटांच्या प्रवासासाठी एक-दीड तास वा कधीकधी याहीपेक्षा अधिक वेळ वाया घालवावा लागतो. त्यामुळे वाहतूक कोंडीतून कधी सुटका होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
खड्डे भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरु
मे २०२५ मध्ये हा प्रकल्प पूर्ण करत प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल, अशी माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी शुक्रवारी इगतपुरी येथे समृद्धी महामार्गाच्या दौर्यादरम्यान पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान हा महामार्ग आठ पदरी झाल्यास वडपे ते ठाणे अंतर केवळ २५ मिनिटांत पार होईल असा दावा यानिमित्ताने एमएसआरडीसीने केला आहे. त्याचवेळी सध्या २३ किमी दरम्यानचे खड्डे भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याचेही सांगण्यात येत आहे.