Monday, June 23, 2025

Mumbai-Pune : मुंबई-पुणे प्रवास होणार आणखी वेगवान! मरे'कडून दोन नव्या मार्गांचा प्रस्ताव

Mumbai-Pune : मुंबई-पुणे प्रवास होणार आणखी वेगवान! मरे'कडून दोन नव्या मार्गांचा प्रस्ताव

मुंबई : मुंबई-पुणेदरम्यान (Mumbai-Pune) रोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढताना दिसून येत आहे. मुंबई- पुणे प्रवासादरम्यान १९२ किमीचे अंतर असून, या मार्गावर एकूण ४४ रेल्वेगाड्‌या धावतात. त्यापैकी २३ रेल्वेगाड्‌या रोज धावणाऱ्या असून उर्वरित रेल्वेगाड्‌या साप्ताहिक, द्विसाप्ताहिक आणि त्रैसाप्ताहिक स्वरुपात आहे. त्यामुळे आता मुंबई आणि पुर्ण दरम्यानचा रेल्वे प्रवास आणखी वेगवान आणि आरामदायी होण्यासाठी मध्य रेल्वेने नवीन प्रस्ताव (New Railway Line) तयार केला आहे. त्यानुसार प्रवाशांचा लोणावळा न गाठता पुणे प्रवास करता येणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेने मुंबई आणि पुणे या दोन शहरांना जोडण्यासाठी कर्जत ते तळेगाव आणि कर्जत ते कामशेत हे दोन नवे मार्ग तयार करण्यासाठीचा प्रस्ताव आखला आहे. त्यामुळे प्रवाशांना लोणावळा घाट टाळून पुणे गाठता येणार आहे. याआधी मुंबई-पुणे प्रवासासाठी ३ तास लागत होते. मात्र नव्या मार्गावर घाट नसल्याने रेल्वेगाड्‌या प्रतितास ११० किमी वेगाने धावू शकणार आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या या प्रस्तावामुळे हा प्रवास दोन ते अडीच तासांत पूर्ण करता येणार आहे.


दरम्यान, मध्य रेल्वेकडून दोन्ही मार्गाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यापैकी एक मार्ग मंजूर झाल्यावर त्याचे काम सुरु करण्यात येईल, असे रेल्वे अधिकाऱ्याऱ्यांनी सांगितले आहे. याचबरोबर नव्या १० रेल्वेगाड्या चालवण्याचा पर्याय देखील मध्य रेल्वेकडून खुला करण्यात आला आहे.



खर्च किती?


मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर चार वर्षांत प्रकल्प पूर्ण होईल असे सांगितले आहे. तर कर्जत ते तळेगाव नव्या मार्गासाठी १६,००० कोटी आणि कर्जत ते कामशेत नव्या रेल्वे प्रकल्पासाठी १०,२०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा