मुंबई: भारताने पॅरिस ऑलिम्पिक २०२४मध्ये एकूण ६ पदके जिंकली. टोकियो ऑलिम्पिकच्या तुलनेत पदकांची संख्या कमी झाली. भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ७ पदके जिंकली होती. ऑलिम्पिकच्या इतिहासातील त्यांचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन होते.
यंदाच्या वर्षी ११९ भारतीय खेळाडूंचे दल पॅरिसला पोहोचले होते. यात नेमबाज मनू भाकरने दोन पदके मिळवली होती. या खेळाडूंपैकी ५ खेळाडूंवर सरकारने सर्वाधिक पैसे खर्च केले होते. यात नीरज चोप्रा, मीराबाई चानू, पीव्ही सिंधू, सात्विक-चिराग आणि अनीश भानवाला यांचा समावेश होता.
या खेळाडूंच्या तयारीसाठी सरकारने कोट्यावधी रूपये खर्च केले मात्र यातील नीरज चोप्राला या ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवता आले. त्याने भारताला रौप्य पदक मिळवून दिले.
भारतीय अॅथलेटिक्सचा पोस्टर बॉय नीरज चोप्रावर ५.८२ कोटी खर्च करण्यात आले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये रौप्य पदक आपल्या नावे केले. अॅथलेटिक्समद्ये सलग दोन ऑलिम्पिक पदक जिंकणारा नीरज पहिला भारतीय ठरला. नीरजने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ८९.४५ मीटर थ्रो करत दुसऱ्या स्थानावर राहिला तर पाकिस्तानचा अर्शद नदीम ९२.९७ मीटर थ्रो करत पहिले स्थान मिळवले.
बॅडमिंटनपटू चिराग-सात्विक जोडीवर खर्च झाले ५.६२ कोटी
बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीकडून पॅरिसमध्ये पदकाची अपेक्षा होती. मात्र या जोडीने निराश केले. दोन्ही खेळाडूंवर ५.६२ कोटी रूपये खर्च केले होते. मात्र भारतीय जोडीला पुरुष वर्गात क्वार्टरफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूकडून पॅरिसमध्ये सलग तिसरे पदक जिंकण्याची अपेक्षा होती. मात्र तिनेही निराश केले. त्यांच्यावर ३.१३ कोटी खर्च करण्यात आले होते.
मीराबाई चानूला चौथा नंबर
वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू चौथ्या स्थानावर राहिले. तिने टोकियोमध्ये रौप्य पदक जिंकले होते. पॅरिसमध्ये तिच्याकडून रौप्य अथवा कांस्य पदकाची अपेक्षा होती. मात्र ती पदक जिंकण्यात अय़शस्वी ठरली. मीराबाईवर २.७४ कोटी खर्च करण्यात आले होते.