ठाकरेंच्या गाडीवर शेण आणि बांगड्या फेकल्याप्रकरणी मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया
ठाणे : ठाण्यात (Thane) गडकरी रंगायतन या सभागृहात शनिवारी सायंकाळी ठाकरे गटाचा (Thackeray Group) मेळावा पार पडला. यावेळी या मेळाव्यासाठी कार्यक्रमस्थळी दाखल झालेल्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना व मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. मनसे व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. तसेच काही कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यातील कारवर शेण, नारळ व बांगड्या फेकल्या. त्याचबरोबर त्यांच्या ताफ्यातील कारच्या काचाही फोडल्या. यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘अॅक्शनला-रिअॅक्शन’ मिळते असं म्हणत त्यांनी ठाकरेंना डिवचलं आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, “राज ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यात ठाकरे गटाने याची सुरूवात केली. ही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा नाही. दगडफेक करणं, सुपाऱ्या टाकणं हे कुणालाही आवडलं नाही. शेवटी ‘अॅक्शनला-रिअॅक्शन’ मिळते. पण, याचं कुठलंही समर्थन करणार नाही”, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
“आम्ही सत्तेत आल्यापासून हे ‘सरकार घटनाबाह्य आहे, एक महिन्यात पडणार’ असं बोललं जातं. दोन वर्षे झाली, सरकार अधिकाधिक मजबूत होत गेले. कारण, आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे विचार सोडले नाहीत. त्यामुळे लोक आमच्यासोबत येत आहेत. ज्यांनी विचार सोडले, त्यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. म्हणून आपले ध्येय, विचार ठरवले पाहिजे. सत्तेसाठी कुठलीही तडतोड आम्ही केली नाही,” असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.
“धनुष्यबाण वाचविण्यासाठी आम्ही बंड करण्याचा निर्णय घेतला. आमचं सरकार स्थापन झाल्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना पक्ष भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकावर होता. लोकसभेला ‘स्ट्राइक रेट’ पाहिला, तर लोकांनी पसंती आणि मान्यता कुणाला दिली, हे सांगण्याची आवश्यकता नाही,” अशी कोपरखळी मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे गटाला मारली आहे.