कृउबा बनावट पावती पुस्तक प्रकरणाला नवीन वळण
नाशिक/ पंचवटी (प्रतिनिधी)– नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत बनावट पावती पुस्तकाच्या आधारे बाजार समिती फीची रक्कम वसूल करून त्यात ९० लाखांचा अपहार केल्या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी तत्कालीन सचिव अरुण काळे यांना अटक केली . त्यांना आधी पाच आणि दुसऱ्यांदा तीन अशी एकूण आठ दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. पोलिस तपास पुढे सरकत असताना या प्रकरणाचे पाय आणखी खोलात जात असून पोलीसांनी बाजार समितीतील छपाई विभागातील महिला कर्मचाऱ्यास ताब्यात घेतले आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकुण १२ पावती पुस्तकांचा गैरवापर करून तसेच पावती पुस्तकांमध्ये खाडाखोड करून संस्थेच्या दप्तरात फेरफार करून त्याव्दारे एकुण ८९ लाख ७७ हजार २०० रुपयांचा अपहार करून कृषी उत्पन्न बाजार समितीची फसवणुक व विश्वासघात केल्या प्रकरणी नाशिक कृषि उत्पन्न बाजार समिती सचिव प्रकाश घोलप यांनी सुनील जाधव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. संशयित सुनील जाधव यांनी प्रथम नाशिक न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला मात्र, तो न्यायालयाने फेटाळला होता. त्यावेळी जाधव यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.या प्रक्रियेत उच्च न्यायालयाने काही निरीक्षणे नोंदवली होती. तसेच या गुन्ह्यात तत्कालीन सचिव संशयित अरूण काळे यांनी पोलिसांना तपास कामात सहकार्य न करणे, न्यायालयात तारखेस वेळीच हजर न राहणे, न्यायालयात मागितलेले कागदपत्र सादर न करणे, वेळोवेळी आदेश देऊन देखील त्याचे पालन न करणे या कारणाहून न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. काळे यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवार दि.५ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. तीही मुदत संपल्यानंतर पुन्हा त्यांच्या पोलिस कोठडीत तीन दिवसांची वाढ करून बुधवार दि.७ पर्यंत पोलिस कोठडी वाढविण्यात आली होती. आता महिला कर्मचाऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर यात आणखी किती लोकांचा व कुणाचा नंबर लागतो याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
छोटे तीन मासे गळाला:आणखी मासे हाती लागण्याची शक्यता
बाजार समितीतील बाजार फी वसुलीच्या बनावट पावती पुस्तक प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत बाजार समितीचा कर्मचारी सुनील जाधव, तत्कालीन सचिव संशयित अरूण काळे आणि आता छपाई विभागातील महिला कर्मचाऱ्यास ताब्यात घेतल्याने आत्तापर्यंत तीन छोटे मासे पोलिसांच्या गळाला लागले असून पुढील तपासात मोठे मासे हाती लागण्याची शक्यता असून आणखी किती मासे गळायला लागतात की गळ सोडून पळतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.