Friday, May 9, 2025

महामुंबईब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Mumbai water supply : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांतील एकूण पाणीसाठा ९० टक्क्यांवर!

Mumbai water supply : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांतील एकूण पाणीसाठा ९० टक्क्यांवर!

मुंबईकरांचा पाणीप्रश्न मिटला; जाणून घ्या कोणत्या धरणात किती टक्के पाणी?


मुंबई : मुंबईत गेले काही दिवस सातत्याने पावसाच्या धारा (Mumbai rain) सुरु आहेत. त्यामुळे मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमधील एकूण पाणीसाठा ९० टक्क्यांवर पोहोचला आहे. अशाच पद्धतीने पाऊस बरसत राहिला तर हा पाणीसाठा लवकरच १०० टक्के होईल. आनंदाची बातमी म्हणजे ७ जलाशयांपैकी ४ जलाशये ओव्हर फ्लो झाली आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा पाणीप्रश्न मिटला आहे.


मुंबई महानगरपालिकेने आज दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा ९० टक्के इतका झाला आहे. आज सकाळी ६ वाजता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा १३,०२,६१९ दशलक्ष लीटर इतका झाला. म्हणजेच या धरणांमध्ये एकूण ९० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागच्या वर्षी याच दिवशी या धरणांमध्ये ११,५७,९१९ दशलक्ष लिटर म्हणजेच ८० टक्के पाणीसाठा होता. तुलनेने यावर्षी तो १० टक्क्यांनी वाढला आहे.


मुंबई शहर आणि उपनगराला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या ७ जलाशयांमधून पाणी पुरवठा केला जातो. यामध्ये ५ धरणं आणि २ तलाव आहेत. या सातही धरण आणि तलाव क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यामधील तुलसी, विहार, मोडक सागर आणि तानसा ही जलाशये ओव्हर फ्लो झाली आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या सातही धरणांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. या धरणांमधून मुंबईला दिवसाला ३ हजार दशलक्ष लिटर पाणीपुरववठा केला जातो.



मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा -


अप्पर वैतरणा - ७५.७६ टक्के पाणीसाठा
मोडक सागर - १०० टक्के पाणीसाठा.
तानसा - ९९.३० टक्के पाणीसाठा.
मध्य वैतरणा - ९५.४१ टक्के पाणीसाठा.
भातसा - ८८.८७ टक्के पाणीसाठा.
विहार - १०० टक्के पाणीसाठा.
तुलसी - १०० टक्के पाणीसाठा.

Comments
Add Comment