कथा – प्रा. देवबा पाटील
जयश्रीचे वडील तर दिवसभर शेतात जायचे, पण आईला तिच्या बाल्यावस्थेमुळे तिचा सांभाळ करण्यासाठी घरी राहावे लागायचे. ती खूप हुशार असल्यामुळे तिच्या आईने तिच्या बुद्धीची तरलता, अंगीची कलात्मकता हेरली व बालपणापासूनच तिच्या बुद्धीवर वाचन, संस्कार करणे सुरू केले. तिची आई तिला आपल्याजवळील पुस्तकांमधून उत्तमोत्तम गोष्टी, छान छान कविता वाचून दाखवायची. त्यामुळे तिलाही वाचता येऊ लागल्यापासूनच वाचनाची गोडी लागली. आईने तिला दररोज सकाळी स्नानानंतर गणपती व सरस्वती स्तोत्र नि संध्याकाळी शुभं करोती कल्याणम् आणि दिव्या दिव्या दीपत्कार हे स्तोत्र म्हणण्याचे वळणही लावले. स्तोत्र, गोष्टी, कवितांच्या श्रवणाद्वारे तिच्या मनावर चांगले संस्कार घडू लागले.
बालपणापासूनच चित्रकला, हस्तकला, भाषण, नाट्य, वक्तृत्व इ. बाबींमधील तिची आवड बघून आईने तिला त्या गोष्टीही शिकवणे सुरू केले. त्यातही ती आपली कलात्मकता उत्कृष्टपणे सादर करू लागली. तिला खेळांचीसुद्धा खूप आवड होती. विविध खेळांमध्ये सहभाग घेऊन ती त्यातही आपले प्रावीण्य दाखवू लागली. अशी ही विविध कलागुणसंपन्न जयश्री जेव्हा शाळेत जाऊ लागली तेव्हा पहिल्या वर्गापासूनच शाळेतही अभ्यासात, खेळांत वा कोणत्याही उपक्रमात मागे राहत नव्हती. प्रत्येक गोष्टीत ती नावाप्रमाणे नेहमी प्रथमच क्रमांकाचे पारितोषिक मिळवून विजयी होत होती. दरवर्षी परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत होती. ही जयश्री शाळेची एकेक पायरी चढत सहाव्या वर्गात पोहाेचली.
आईच्या उत्तम संस्कारांमुळे जयश्री दररोज सकाळी सूर्योदयापूर्वीच लवकर उठून आईसोबत प्राणायाम, योगासने करून, सूर्यनमस्कार काढून शाळेत जाईपर्यंत आपला अभ्यास पूर्ण करून घ्यायची. तसेच संध्याकाळी जेवण झाल्यानंतरसुद्धा झोपेपर्यंत न चुकता आपला अभ्यास करायची. नियमित खेळल्याने सपाटून भूक लागते, पचनही चांगले होते व आरोग्यही निरोगी राहते हे जयश्रीच्या आईला माहीत असल्याने ती जयश्रीला दररोज सायंकाळी शाळा सुटल्यानंतर अर्धा तास घराच्या बाजूच्या मोकळ्या मैदानावर तिच्या मैत्रिणींसोबत खेळायला जाऊ देत असे. मैदानावर त्या मैत्रिणी खूप खूप खेळायच्या. असेच एका दिवशी संध्याकाळी बाहेरून मैत्रिणींसोबत खेळून झाल्यानंतर जयश्री थकून भागून घरी आली. त्यावेळी नेहमीसारखी आई स्वयंपाकघरात होती. खेळल्याने तिला खूप भूक लागली होती. आल्याबरोबर तिने आई, मला खूप भूकही लागली आहे. काहीतरी थोडेफार खायला देना आणि आपणास भूक कशी लागते तेही सांगना. असे म्हणत आईजवळ जात खायला मागितले.
तू आता नुकतीच खेळून आली आहेस. व्यायाम झाल्यावर म्हणजे खेळून आल्यानंतर अर्ध्या तासात काहीच खाऊ-पिऊ नये. आधी हात-पाय स्वच्छ धू. मग येथे ये. थोडी शांत बस. थोडा वेळ जाऊ दे. शरीर संथ होऊ दे. मग मी तुला काही खायलाही देते व स्वयंपाक करता करता भूक कशी लागते, ते नीट समजावूनही सांगते. आई म्हणाली.
तशी जयश्री हातपाय धुवायला स्नानगृहात गेली. तिने गार पाण्याने हात-पाय व तोंड धुतले, ते टॉवेलने कोरडे केले नि टॉवेल तेथे नीट घडी करून ठेवून दिला. ती पुन्हा आईजवळ स्वयंपाकघरात गेली व नेहमीप्रमाणे खाली मांडी मारून बसली व म्हणाली, ए आई, आपल्या शरीराच्या आपण या ज्या अनेक क्रिया करत असतो त्या कशा काय होतात गं?
आईने त्या दिवशी केलेले ताजे ताजे शंकरपाळे एका प्लेटमध्ये तिला खायला दिले. जयश्री ते खाऊ लागली व आई आपली स्वयंपाकाची तयारी करता करता तिला सांगू लागली, बाळा, आपल्या शरीरात अनेक क्रिया-प्रक्रिया सतत चालूच असतात. यातील काही क्रिया आपण आपल्या इच्छेने करतो, तर काही क्रिया या आपली इच्छा असो वा नसो त्या आपोआप होतच राहतात. ज्या आपण आपल्या इच्छेनुसार करतो त्यांना ऐच्छिक क्रिया म्हणतात. उदा. चालणे, बोलणे, हात-पाय हालवणे, उडी मारणे अशा अनेक क्रिया या ऐच्छिक क्रिया होत. पण आपला श्वासोच्छ्वास, हृदयाची धडधड, रक्ताभिसरण, अन्नाचे पचन या क्रिया आपल्या शरीरात सतत चालूच असतात. त्यांना अनैच्छिक क्रिया म्हणतात. तसेच निसर्गत: आपल्या शरीराकडून आपोआप होणाऱ्या क्रियांना प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतात किंवा आपल्या शरीराच्या अवयवांच्या संरक्षणाकरिता मेंदूच्या नकळत मज्जारज्जूंद्वारा आपल्या अवयवांच्या ज्या काही क्रिया घडून येतात त्यांना प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतात. मग आईने तिला नाश्ता दिला व ती नाश्ता करू लागली.