नेमकी कोणत्या मुद्द्यांवर होणार चर्चा?
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आपल्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली. राज्यातील वाढती गुन्हेगारी, कायदा आणि सुव्यवस्था, आरक्षणाचा प्रश्न आणि जातीवाद तसेच आणखी अनेक मुद्द्यांवर या भेटीत चर्चा होणार असल्याचं समजत आहे. यात प्रामुख्याने यशश्री शिंदे हिच्या हत्याप्रकरणाची केस फास्टट्रॅक कोर्टात चालवावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत.
मागील काही महिन्यांपासून राज्यात वाढती गुन्हेगारी तसेच महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण गंभीर बनत चाललं आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत. त्यातच उरण येथील यशश्री शिंदे या २२ वर्षीय तरुणीच्या हत्येने अख्या महाराष्ट्राला हादरवून टाकलं आहे. यावर चर्चा करण्यासाठी राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.
राज्यात सध्या गाजत असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि जातीवाद या विषयावर देखील राज ठाकरेंनी चर्चा करणार आहेत. बैठकीला मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी भूषण गगराणी देखील उपस्थित आहेत. दरम्यान, यावेळी राज ठाकरे यांनी मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास, पोलीस वसाहतींचा पुनर्विकास, घरांची उपलब्धता विविध विषयांवर देखील मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचे समजत आहे.
या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता
– उरण येथे यशश्री शिंदे या तरुणीची झालेली हत्या, हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावे अशी मागणी राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करणार आहेत.
– आरक्षण आणि जातीवाद या विषयावर देखील राज ठाकरे मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत.
– राज्यात महिलांसंदर्भात निर्माण झालेला कायद्या सुव्यवस्थेचा प्रश्न.
– पुण्यात आलेला पूर, शहरांचं नियोजन, वाढती बांधकामे, पाणी व्यवस्थापन आणि राज्यात रखडलेले महत्वाचे प्रकल्प या विषयावर देखील राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहेत.
– वरळी पोलिस कॅम्प निवृत्ती कर्मचारी भाडेवाड समस्या.
– वरळी गोमाता नगर पुर्नविकास प्रकल्प.
– बुधवळ जिल्हा जळगाव पंतप्रधान आवास योजना यासह अन्य विषयांवर राज ठाकरे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आङेत.
चर्चेला कोण कोण उपस्थित?
मनसेच्या शिष्टमंडळात राज ठाकरे यांच्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील, मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांचा समावेश आहे. तसेच मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे, अजित अभ्यंकर, वैभव खेडेकर,अभिजित पानसे आणि इतर पदाधिकारी देखील राज ठाकरे यांच्यासोबत वर्षा बंगल्यावर उपस्थित आहेत.
या चर्चेला राज्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित आहेत. राज्य प्रशासनातील मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव वलसा नायर सिंह, जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव सचिव दीपक कपूर, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर, तसेच गृह विभाग वित्त विभाग, एमएमआरडीए आणि इतर विभागांचे अधिकारी उपस्थित आहेत.