विरार : राज्यात अपघातांचे वाढते प्रमाण मोठी समस्या बनत चालली आहे. पुणे आणि वरळीच्या हिट अँड रन (Hit And Run) प्रकरणाने राज्यात खळबळ उडवून दिली होती. त्यानंतरही राज्यात ठिकठिकाणी हिट अँड रनच्या घटना सातत्याने समोर येत होत्या. त्यातच आता विरारमधूनही (Virar Accident) धक्कादायक बातमी समोर आली आहे. विरारमध्ये कारच्या धडकेत एका प्राध्यापिकेचा मृत्यू झाला आहे. आत्मजा कासट असं प्राध्यापिकेचं नाव असून त्या उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटकही करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विरारमधील उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयातील ४५ वर्षीय प्राध्यापिका आत्मजा कासट या गुरुवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास महाविद्यालय सुटल्यावर विरार पश्चिमेच्या गोकुळ टाऊनशिप येथील आपल्या राहत्या घरी पायी जात होत्या. मुलजीभाई मेहता शाळेसमोरुन त्या जात होत्या. तेवढ्यात मागून एक भरधाव फॉर्च्युनर गाडी आली आणि आत्मजा यांना गाडीने धडक दिली.
या धडकेमुळे आत्मजा दुभाजकावर जाऊन पडल्या. त्यांना कारचालकाने तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान, त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याप्रकरणी अर्नाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, रात्री उशिरा गुन्हा दाखल करुन, शुभम पाटील या कारचालकाला अटक केली आहे.