Sunday, June 15, 2025

Kolhapur news : कोल्हापुरात पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर उलटल्याने ८ जण वाहून गेले!

Kolhapur news : कोल्हापुरात पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर उलटल्याने ८ जण वाहून गेले!

तीन जणांचा शोध लागला तर पाच जण बेपत्ता


कोल्हापूर : राज्यात पावसाने जोर (Heavy rainfall) धरल्यामुळे अनेक दुर्घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी (Kolhapur news) समोर आली आहे. कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशातच शिरोळ तालुक्यात पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर उलटून मोठी दुर्घटना घडली. ट्रॅक्टरमधील ८ जण वाहून गेले आहेत. यापैकी तिघांना वाचवण्यात यश आलं आहे तर इतर ५ जणांचा शोध सुरु आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरात पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. अशातच गावाला होणारा पाणीपुरवठा करण्यासाठी गावातील काही नागरिक ट्रॅक्टरमधून विद्युत पंप सुरू करण्यासाठी जात होते. या ट्रॅक्टरमधून ८ जण प्रवास करीत होते. त्याचवेळी शिरोळ तालुक्यात बस्तवड - अकिवाट मार्गावर पुराच्या पाण्यात अचानक ट्रॅक्टर उलटला. त्यामुळे ट्रॅक्टरमध्ये बसलेले आठही लोक पाण्यात बुडाले.


घटनास्थळी एनडीआरएफची टीम दाखल झाली असून पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. यापैकी तिघांना वाचवण्यात यश आलं असून नाकातोंडात पाणी गेल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, अजूनही ५ जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे. या घटनेमुळे परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा