मुंबई : गणेशोत्सव (Ganeshotsav) म्हणजे कोकणातील चाकरमान्यांचा आवडता सण. गणेशचतुर्थी जवळ येऊ लागली की मुंबईत राहणारा कोकणी माणूस हक्काने ऑफिसला सुट्ट्या टाकून आधी गावच्या घराकडे पळतो. चतुर्थीच्या काही दिवस आधीच गावी जाऊन सर्व तयारी करण्याचा चाकरमान्यांचा मानस असतो. यामुळे कोकण रेल्वेची आरक्षणे (Konkan Railway Reservation) सुरु झाली की लगेच तिकीटे विकली जातात. मात्र, गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही कोकण रेल्वेच्या आरक्षणात काळाबाजार झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याचं कारण म्हणजे बुकिंग सुरु होताच आठ मिनिटांतच गणपती स्पेशल गाड्यांची (Ganpati Special Trains) तिकीटे संपली आहेत. यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच तिकीट आरक्षणाबद्दल चौकशी करण्याची मागणीही प्रवाशांनी केली आहे.
यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबई ते कोकण दरम्यान २०२ विशेष रेल्वे गाडया चालवण्याच्या मध्य रेल्वेच्या नियोजनाला भारतीय रेल्वेने हिरवा कंदील दिला. कालपासून विशेष गाड्यांच्या आरक्षणास सुरुवात झाली. मात्र आरक्षण सुरू होताच पहिल्या आठ ते दहा मिनिटांतच आरक्षण फुल झाले. यामुळे तिकीट आरक्षणात पुन्हा एकदा काळाबाजार सुरु आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी प्रवासी संघटनांकडून करण्यात आली आहे.
मागील वर्षी झाला होता काळाबाजार
गणेशोत्सवासाठी रेल्वेने सोडलेल्या गाड्यांचे आरक्षण सुरू होताच पहिल्या आठ ते दहा मिनिटांतच आरक्षण फुल झाले. काही प्रवाशांनी अनेक प्रयत्न करूनही प्रतीक्षा यादीतच त्यांचे नाव राहिले. मागील वर्षी देखील अशाच प्रकारे आरक्षण काही मिनिटात फुल झाले होते. कोकणकन्या एक्सप्रेसची प्रतीक्षा यादी अवघ्या दीड मिनिटांतच एक हजारांपार गेली होती. त्यामुळे तिकीट आरक्षणात काळाबाजार झाल्याची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली होती. तपासाअंती यात अनेक तिकीट आरक्षण खाती बनावट असल्याचे उघड झाले होते. यंदाही तिकीट आरक्षण काही मिनिटात फुल झाल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत. तिकीट आरक्षणाची चौकशी करा आणि दोषींवर कारवाई करा, अशी मागणी आता प्रवासी संघटनांकडून होत आहे.