मुंबई : राज्यात सध्या आरक्षणाचा (Reservation) मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा आणि ओबीसी समाजाने (Maratha Vs OBC) परस्परविरोधी मागण्या करत राज्य सरकारला कोंडीत पकडलं आहे. यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहे. मात्र, विरोधक या गोष्टीचं राजकारण करत राज्य सरकारवर टीका करत आहेत. यामुळे भाजपा नेत्यांनीही विरोधकांवर आपलं टीकास्त्र उपसलं आहे. भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनीही आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडत उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला. यावेळेस त्यांनी मनोज जरांगेंनाही (Manoj Jarange) टोला लगावला, तर पोपटलाल म्हणत संजय राऊतांवरही (Sanjay Raut) टीका केली.
आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपा नेत्यांवर सातत्याने गंभीर आरोप करत असतात. शिवराळ भाषा वापरत असतात. यावर आशिष शेलार म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलणाऱ्यांनी नक्की उपोषण करावे, पण उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर का बोलत नाहीत, असा सवालही नाव न घेता मनोज जरांगे पाटील यांच्यावरही निशाणा साधला.
आशिष शेलार म्हणाले, मराठा आरक्षणाला भाजपचे समर्थन आहे, आमच्या देवेंद्र फडणवीस यांनी कायदा केला पण माशी शिंकली कुठे?, मराठा आरक्षणाचा खून उद्धव ठाकरेंनी केला, यांनी बाजू मांडली नाही, अशा शब्दात त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ठाकरेंना लक्ष्य केलं.
पोपटलाल म्हणत संजय राऊतांवर टीका
जगभरात मोदींचे चाहते वाढलेले आहेत, बायडन आणि ट्रम्प यांना देखील मोदींनी मागे टाकले आहे. मोदी आणि भाजपचे यश हे तुमच्या माझ्यासाठी प्रेरणा देणारे आहे. आज गुरुपौर्णिमा आहे, पण भारत आज विश्वगुरू आहे. कुठलाही देश असो मदत करतो तो भारतच. सकाळी न सांगता येणारे पत्रकार पोपटलाल म्हणत होते की मोदी ब्रँड संपला आहे. पण, देशातल्या सर्व राज्यात आपण निवडून आलो. काही लोक पाच ठिकाणी आले, काही लोक एका जागेपुरते आले पण संपूर्ण राज्यात फक्त एकमेव पक्ष आहे तो म्हणजे भाजप, असे म्हणत आशिष शेलार यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला.