चंद्रपूर : मुंबईसह राज्यभरात सध्या पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. त्यातच चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना देखील पावसाने झोडपून काढलं आहे. गेल्या दोन दिवसात उपराजधानी नागपूरसह (Nagpur News) पूर्व विदर्भात पावसाने हाहाकार माजवला आहे. अतिवृष्टीमुळे शेकडो घरं पाण्याखाली गेली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे, तर अनेक जनावरेही दगावली आहेत. चंद्रपुरात पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मधल्या काळात पावसानं दांडी दिल्याने विदर्भातील शेतकऱ्यांची चिंता वाढवली होती. मात्र, आता पावसाने जोर लावला असून दाणादाण उडवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपुरात पावसाचा कहर सुरु आहे. चंद्रपूर-मूल मार्गावरील चिचपल्ली गावातील गावतलाव फुटल्याने गावातील अंदाजे १०० ते १५० घरांमध्ये पाणी शिरलं आहे. सलग दोन दिवस पाऊस झाल्याने गावतलावातील पाण्यात मोठी वाढ झाली आहे. आज पहाटे तलावाची पाळ फुटून गावात पाणी शिरले आहे. परिणामी गावातील ग्रामस्थांचे धान्य आणि इतर साहित्याचे मोठं नुकसान झाले आहे. सोबतच गावातील जवळपास १०० बकऱ्या आणि इतर जनावरं देखील या पुरात दगावले आहेत.
पावसाचा सर्वाधिक फटका पूर्व विदर्भाला बसला आहे. शेतकऱ्यांनी शेतीसाठी घरात आणून ठेवलेले खत आणि बी-बियाणेही पाण्यात भिजले आहे. एकूणच शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि वित्त हानी झाल्याचे चित्र आहे. संभाव्य पावसाचा धोका लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या (IMD) वतीने करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांचे सर्व यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश
महाराष्ट्रात पडत असलेल्या अतिमुसळधार पाऊसामुळे कुठे ही आपत्कालीन परिस्थिती उद्धभवू नये यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, राज्यातील सर्व महापालिका आयुक्त आणि आपत्कालीन यंत्रणांच्या प्रमुखांशी फोनवरून चर्चा केली आहे. सर्व यंत्रणांना सतर्क राहाण्याचे आदेश यावेळी देण्यात आले आहेत.
सह्याद्री पर्वतरांगांच्या पूर्व आणि पश्चिम उतारावर अतिमुसळधार पाऊस पडत आहे. या ठिकाणी नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणी पूर नियंत्रण यंत्रणा सज्ज करणे, तसेच रविवार असल्यामुळे वर्षा पर्यटनालाठी मोठ्या संख्येने पर्यटक बाहेर पडले आहेत. त्यांना धोकादायक परीस्थितीची वेळीच जाणीव करून देणे सोबतच अती धोकादायक ठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.