मुंबई : मराठा आणि ओबीसी समाजाच्या संघर्षामुळे (Maratha Vs OBC) राज्य सरकार कोंडीत सापडलं आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. त्यामुळे भाजपा नेते आणि मनोज जरांगे यांच्यात सतत वाद प्रतिवाद सुरु असल्याचं चित्र आहे. त्यातच आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनीदेखील जरांगेंचं नाव न घेता त्यांना लक्ष्य केलं. यावेळेस त्यांनी उद्धव ठाकरेंवरही (Uddhav Thackeray) जोरदार निशाणा साधला. ‘उद्धव ठाकरेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी असून देवेंद्र फडणवीस यांना व्हिलन केलंय जातंय’, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ते पुणे येथील भाजपच्या महाअधिवेशनात बोलत होते.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्यात भाजप-शिवसेना युतीच्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. मी त्यावेळी मंत्री होतो. देवेंद्र फडणवीस यांनी सलग २० रात्र जागून मराठा आरक्षणाचा कायदा तयार केला होता. त्यावेळी आम्ही त्यांना म्हणायचो, की तब्येतीची काळजी घ्या. शेवटी त्यांनी मराठा आरक्षणाचा कायदा तयार केला. विधीमंडळात तो एकमताने मंजूर करण्यात आला. हायकोर्टाने देखील या कायद्याला मंजूरी दिली. पण त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या सरकारने मराठा समाज कसा आर्थिक दुर्बल आणि कमजोर आहे, त्यामागचा भाग सुप्रीम कोर्टात मांडला नाही. त्यामुळे मराठा आरक्षण रद्द झालं, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
“उद्धव ठाकरे यांनी जर सुप्रीम कोर्टात ४ चांगले उच्चस्तरीय वकील दिले असते, तर मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न कायमचाच सुटला असता. पण असं झालं नाही. त्यामुळे मराठा समाजाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरे आहेत. आज सामाजिक आंदोलनाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना व्हिलन केलं जातंय. काहींच्या तोंडातून राजकीय वास येतोय”, अशी टीकाही बावनकुळे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर नाव न घेता केली.