Thursday, March 20, 2025
Homeताज्या घडामोडीAjit Pawar : विधानसभा एकत्र पण महापालिका स्वतंत्र लढणार!

Ajit Pawar : विधानसभा एकत्र पण महापालिका स्वतंत्र लढणार!

राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अजित पवारांची घोषणा

पुणे : सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात विधानसभेचे (Vidhansabha) वारे वाहू लागले आहेत. विधानसभा निवडणुकांमध्ये बाजी मारण्यासाठी महायुती (Mahayuti) व महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) कंबर कसली आहे. दोन्ही आघांड्याकडून आपणच अव्वल ठरणार, असा दावा केला जात आहे. मात्र, या आघाड्या केवळ विधानसभेपुरत्याच असल्याचं सध्या चित्र आहे. याचं कारण म्हणजे आज पुण्यात अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला. यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण स्वबळावर लढायच्या आहेत, असं आवाहन अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केलं. त्यामुळे अजितदादांची राष्ट्रवादी विधानसभा महायुतीसोबत एकत्र पण महापालिका स्वतंत्र लढवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

आज पिंपरी चिंचवड, पुणे शहर आणि ग्रामीण असे मेळावे घ्यायचे होते, पण ग्रामीण मेळावा होऊ शकला नाही, असे म्हणत अजित पवारांनी पिंपरीच्या मेळाव्यातील भाषणाला सुरुवात केली. आज गुरुपौर्णिमा आहे, मी सर्व गुरूंना वंदन करतो. काही अफवा पसरवल्या जातात, पुण्यात दीपक मानकर आणि पिंपरीमधील कार्यकर्ते सोबत आहेत. विकासासाठी आपण निर्णय घेतला, विरोधी पक्षात राहून आंदोलन करुन विकास होत नाही, प्रश्न सुटत नाहीत. काहीजण गेले, त्यांना स्वातंत्र आहे. आपल्याला पुणे शहरात जोमाने काम करावं लागणार आहे, वेळ फार कमी आहे. आपल्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतला आणि आपण इथपर्यंत पोहचलो.

उद्या नगर दौरा आहे, चार ठिकाणी कार्यक्रम आहे, उद्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अनेकजण पक्षात आले आहेत, त्यांचं स्वागत करतो. अंदाज आहे की विधानसभा निवडणुका ऑक्टोबर शेवटापर्यंत किंवा नोव्हेंबर पहिला आठवड्यात होतील, असे अजित पवारांनी म्हटले. मात्र, त्यासोबतच, लोकसभा- विधानसभा आपण एकत्र लढत असलो, तरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आपण स्वबळावर लढायच्या आहेत, अशी घोषणाच कार्यकर्त्यांसमोर अजित पवारांनी केली. त्यामुळे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुती एकत्र नसणार असल्याचे स्पष्ट झालं आहे.

आरोप प्रत्यारोपला मी उत्तर देत नाही

२००४ पासून मी पालकमंत्री म्हणून काम केलं, आरोप प्रत्यारोपला मी उत्तर देत नाही. मावळात पैसे गेले मावळात पैसे गेले अस बोललं जात होतं, आधी बारामती शिरूरला निधी दिला त्यावर कोणी बोलत नाहीत. सगळ्या आमदार खासदारांना मी बोलू दिलं, कारण नसताना नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो, असे म्हणत डीपीडीसीच्या बैठकीतील खासदार सुप्रिया सुळेंच्या आरोपावर अजित पवारांनी पलटवार केला. तसेच, मीडिया पुढे काही तरी वेगळं मांडण्यात आलं,वडीलधाऱ्यांना बोलू दिलं जातं नाही असं सांगितलं. पण तसं काही नाही, सुसंस्कृत महाराष्ट्राची शिकवण यशवंतराव चव्हाण यांनी आपल्याला दिली आहे, असंही अजित पवार म्हणाले. विशाळगड येथे जे घडू नये ते घडलं, कोर्टाने आदेश दिले, त्यांना आता मदत केली. सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे, जाती जातीमध्ये सलोखा राहिला पाहिजे, सर्वजण गुण्यागोविंदाने राहिले पाहिजे, असंही पवार यांनी म्हटलं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -