Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीMumbai Rain : मुंबईत मुसळधार! सखल भागात पाणीच पाणी तर समुद्रात मोठ्या...

Mumbai Rain : मुंबईत मुसळधार! सखल भागात पाणीच पाणी तर समुद्रात मोठ्या भरतीचा अंदाज

जाणून घ्या लोकलसेवेवर काय परिणाम? 

कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?

मुंबई : हवामान विभागाने दिलेला अतिवृष्टीच्या (Heavy Rain) अंदाजाप्रमाणे पावसाने महाराष्ट्रभर (Maharashtra) जोरदार हजेरी लावली आहे. दोन दिवसांपासून मुंबई शहर, उपनगर, ठाणे, कल्याण आणि डोंबिवली परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे अनेक सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांचा मनस्ताप झाला आहे. त्यासोबत रेल्वेसेवांवरही (Mumbai Local) पावसाचा फटका बसल्याने सकाळी कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसह इतर प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे. काल रात्री आठ वाजल्यापासून आज सकाळी आठ वाजेपर्यंत मुंबई शहरात ९१ मिमी, पूर्व उपनगरात ८७ मिमी आणि पश्चिम उपनगरात ९३ मिमी पाऊस पडला आहे. तर पावसाचा जोर आणखी वाढणार असून मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे.

समुद्रात उसळणार उंच लाटा

आज साडेअकराच्या सुमारास मुंबईच्या समुद्रात भरती येणार आहे. यावेळी समुद्रात ४.२४ मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तोपर्यंत पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबईतील पाण्याचा निचरा होणे कठीण होऊन सखल भागांमध्ये पाणी साचून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

मुंबईची लाईफलाईन मंदावली

सतत सुरु असणाऱ्या पावसामुळे मुंबई आणि ठाण्यातील सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर होताना दिसत आहे. याशिवाय, मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या उपनगरीय रेल्वे सेवेचाही वेगही मंदावला आहे. मध्य रेल्वे १० ते १५, हार्बर रेल्वे १५ तर पश्चिम रेल्वे १० मिनिटांनी उशिराने धावत आहे.

त्याचबरोबर मुंबईत मालाड सबवे, शेल कॉलनी, शितल सिनेमा,कुर्ला आणि आरे परिसरात रस्त्यांवर पाणी साचल्याने इथली बेस्टची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

पालिकेचा दावा फोल

पावसामुळे मुंबईतील हिंदमाता परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे परिसरातील नागरिकांची तारांबळ उडते. हे प्रकरण पाहता पालिकेकडून नालेसफाईचा दावा प्रत्येकवेळी करण्यात येतो. मात्र यंदाही हा दावा फोल ठरल्याचे चित्र दिसून येत आहे. या भागात पाणी साचल्याने नागरिकांसह वाहनचालकांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे.

‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

हवामान विभागाने रत्नागिरी आणि विदर्भातील गडचिरोली या दोन जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा मराठवाड्यातील नांदेड, विदर्भातील गडचिरोली, वर्धा, नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यांना यलो व संपूर्ण मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात आणि मुंबईसह पालघर, पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -