हिंसाचारग्रस्त भागाची काल अजित पवारांकडून पाहणी
कोल्हापूर : संभाजी राजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी विशाळगडावरील अतिक्रमण हटवा मोहिमेसाठी आक्रमक पवित्रा घेतला व १४ जुलै रोजी विशाळगडाकडे (Vishalgad) शेकडो कार्यकर्त्यांसह रवाना झाले. मात्र, या मोहिमेला हिंसक वळण लागलं. विशाळगडावरील स्थानिकांवर हल्ला झाल्याचा प्रकार घडला. इतकंच नव्हे तर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांवर सुद्धा हल्ला करण्यात आला. विशाळगड परिसरातील वाहनांची तसेच घरांची तोडफोड करण्यात आली. गेल्या पाच दिवसांपासून विशाळगडचा मुद्दा तापला असतानाच काल उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विशाळगड परिसरातील हिंसाचारग्रस्त भागाची पाहणी केली. यानंतर आज या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी पार पडणार आहे.
विशाळगड अतिक्रमण मुक्तीला लागलेल्या विशाळगडावरील हिंसक घटनांच्या प्रकरणावर आज हायकोर्टात तातडीची सुनावणी होणार आहे. विशाळगडावरील अतिक्रमणं हटवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने मोहिम हाती घेतली होती. तसेच काही उजव्या विचारसरणीच्या संघटनांकडून 'चलो विशाळगड' किंवा 'विशाळगड बचाव' मोहिम राबवण्यात येत होती. मात्र, या मोहिमेला हिंसक वळण लागल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. हे प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलं असून आज त्यावर सुनावणी होणार आहे.
याचिकाकर्त्यांनी विशाळगडावरील बांधकाम पाडण्यापासून मज्जाव करण्याचे आदेश देण्याची मागणी देखील केली आहे. तसेच बांधकामांना याचिकेवरील अंतिम सुनावणीपर्यंत संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. या बांधकामांविरोधातील कारवाईदरम्यान घडलेल्या घटनांविषयी याचिकेत उल्लेख करण्यात आला आहे.
हिंसाचारग्रस्त भागाची अजित पवारांकडून पाहणी
दरम्यान, विशाळगडाजवळ गजापुरात झालेल्या या हिंसाचाराच्या घटनेनंतर चार दिवसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील आपले सर्व कार्यक्रम रद्द करून विशाळगड परिसरात पोहोचले. त्यांनी हिंसाचारग्रस्त भागाची पाहणी करत पीडितांशी संवाद साधला. पीडितांनी झालेल्या नुकसानाची माहिती देताना कशा पद्धतीने हल्ला करण्यात आला याची माहिती दिली. सरकारने योग्य मदत करावी आणि ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली. शिवाय, या परिसरातील संचारबंदी हटवण्याची मागणीही केली.
यावेळी अजित पवार म्हणाले, मी आताच कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेतली आहे. विशाळगडावरील ज्या व्यवसायिक आस्थापना आहेत, जे अतिक्रमण झालं आहे. त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. तसेच, कोणत्याही घराला हात लावला जाणार नाही, असे अजित पवार यांनी यावेळी पीडितांना सांगितले. गेल्या काही वर्षांपासून किल्ले विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्याची मागणी शिवप्रेमींनी केली होती. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही शिवप्रेमींना विशाळगड येथे येण्याचे आवाहन केले होते. त्यानंत विशाळगडाजवळील गजापुरात जमावाने केलेल्या दगडफेक, जाळपोळ केली. यामध्ये अनेक घरे, वाहनांचे नुकसान झाले.