
रेल्वे सेवाही विस्कळीत
मुंबई : दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या विश्रांतीनंतर पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra Rain) जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने देखील पुढील तीन दिवस मुंबईसह महाराष्ट्रात अतिवृष्टीचा (Heavy Rain) इशारा दिला आहे. त्याप्रमाणे कालपासून मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. आज पहाटेपासूनही पावसाने चांगलाच जोर धरला आहे. अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली असल्यामुळे वाहतुकीवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर रेल्वेच्या (Railway Local) तिन्ही मार्गावरील लोकलसेवाही उशिराने सुरु आहे. यामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. तर पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
रेल्वे लोकलसेवा उशिराने
मुंबईमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर परिणाम झाला आहे. तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू आहे. या पावासाचा परिणाम रस्ते वाहतुकीवर देखील झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली असून मुंबईकरांचे हाल होताना दिसत आहे. प्रवाशांसह सकाळच्या सत्रात शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील काहीसा त्रास सहन करावा लागत आहे.
या भागात मुसळधार पावसाचा अंदाज
मोसमी पावसाचा कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे असून कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय झाले आहे. तर गुजरातपासून ते उत्तर केरळ किनारपट्टीवर समांतर कमी दाबाचा पट्टा कायम राहिला आहे. त्यामुळे आजही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
रत्नागिरी, सातारा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तर ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, वर्धा या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यासोबत जालना, हिंगोली, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाण्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.