१५ दिवसांत आढळले ५२ रुग्ण; १४,०५९ नागरिकांमध्ये आढळली सदृश लक्षणे
मुंबई : मुसळधार पावसासोबत (Heavy Rain) मुंबईकरांवर (Mumbai) लेप्टोस्पायरोसिस (Leptospirosis) या आजाराच्या विळख्याचे संकट निर्माण झाले आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, सध्या मुंबईत लेप्टोस्पायरोसिस आजाराचे १ ते १५ जुलै या १५ दिवसांत तब्बल ५२ रुग्ण आढळले असून, १४,०५९ नागरिकांमध्ये लेप्टोस्पायरोसिस सदृश लक्षणे आढळून आली आहेत.
रस्त्यांवरील खड्डे, सखल भाग अशा ठिकाणी अनेकदा पाणी साचलेले दिसते. आपण देखील वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी खड्ड्यातील साचलेल्या पाण्यातून वाट काढत पुढे जातो. मात्र, याच साचलेल्या पाण्यात लेप्टोस्पायरोसिस या गंभीर आजाराचे विषाणू असण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात मुंबईकरांनी बाहेर पडताना आपली काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
या संदर्भात पालिका प्रशासनाने म्हटले आहे की, लेप्टोसाठी महापालिका विशेष काळजी घेत आहे. लेप्टोस्पायरोसिस बाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी आम्ही घरोघरी जाऊन तपासणी मोहीम राबवत आहोत. आतापर्यंत ६ लाख ८९ हजार ४३३ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे; तर ३२ लाख १० हजार ३९० मुंबईकरांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत ८१,५५६ नागरिकांची ब्लड टेस्ट करण्यात आली, अशी माहिती पालिकेने दिली आहे. यासोबतच यासाठी १२४ आरोग्य शिबिरे घेण्यात आल्याचे महापालिकेने म्हटले आहे.
मुंबईकरांना काळजी घेण्याचे आवाहन
मुंबईत थोडा जरी पाऊस पडला तर लगेच सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात होते. मग चर्चा सुरू होते ती, यंत्रणा काय करतात? करोडो रुपये खर्च करून महापालिका सुविधा देऊ शकत नाही का? असे अनेक प्रश्न पालिका प्रशासनाला विचारले जातात. या संदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागाने मुंबईकरांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.