Thursday, August 7, 2025

Mumbai News : मुंबईतील धोकादायक दरडींच्या ठिकाणी म्हाडा बांधणार ५६ संरक्षक भिंती

Mumbai News : मुंबईतील धोकादायक दरडींच्या ठिकाणी म्हाडा बांधणार ५६ संरक्षक भिंती

भिंतींवर झोपड्या वाढणार नाहीत; प्रशासन घेणार खबरदारी


मुंबई : मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर वाढल्याने डोंगरालगत असलेल्या स्थानिक झोपडीधारकांवर दरड कोसळण्याची टांगती तलवार आहे. त्यामुळे अशा धोकादायक दरडींच्या ठिकाणी तब्बल ५६ मजबूत दगडी भिंती बांधण्याचा प्रस्ताव म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाने तयार करून जिल्हा नियोजन समितीला नुकताच पाठवला आहे. या कामासाठी आवश्यक असलेला निधी मंजूर झाल्यानंतर तत्काळ कामाला सुरुवात केली जाणार आहे.


मुंबई शहरातील दरडप्रवण क्षेत्र कमी असले, तरी उपनगरात भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, चांदिवली, मुलुंड, अणुशक्ती नगर, जोगेश्वरी, कांदिवली, कुर्ला, चुनाभट्टी, काजूपाडा अशा ठिकाणी डोंगरालगत झोपड्या आहेत. या पार्श्वभूमीवर म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाकडून सदर ठिकाणांचा अभ्यास करून दगडी भिंत बांधली जाते. म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाकडून या भिंती उभारल्या जात असल्या, तरी त्यांच्याकडे कोणताही स्वतंत्र निधी नसतो. त्यामुळे त्यांनी ५६ ठिकाणी भिंती बांधण्याचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविला आहे. याबाबतचा निधी मंजूर झाल्यावर काम सुरू केले जाईल, असे म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र या दरडप्रवण डोंगरावर सध्या मोठ्या प्रमाणात झोपड्या बांधल्या जात आहेत. त्यासाठी खोदकाम केले जाते. तसेच डोंगरावर वास्तव्याला असलेले रहिवाशांकडून कचरा, सांडपणी डोगरांवरून खाली सोडतात. त्यामुळे डोंगर कमकुवत होऊन दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात यावर प्रशासन खबरदारी घेणार आहे.


याठिकाणी डोंगराला लागून असलेल्या झोपड्यांवर दरड कोसळू नये यासाठी म्हाडाकडून नेहमी संरक्षक भिंती बांधल्या जातात. मात्र या मजबूत भिंतींवर नागरिक पुन्हा झोपड्या बांधत असल्याने या भिंती पुन्हा कमकुवत होत असून दरडींबरोबरच त्याही कोसळण्याचा धोका असतो. त्यामुळे पालिकेने संरक्षक भिंतींवर झोपड्या वाढणार नाहीत, याबाबत खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे झोपडपट्टी सुधार मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >