एनटीएला शहर व केंद्रनिहाय निकाल जाहीर करण्याचे ‘सुप्रिम’चे आदेश
नवी दिल्ली : नीट-यूजी पेपल लीक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी (१८ जुलै) महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. या सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी एनटीएला (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) उमेदवारांची ओळख लपवून शहर आणि केंद्रनिहाय निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. एनटीएने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर हे निकाल प्रसिद्ध करावेत, असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितले. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पार्दीवाला व न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने वादग्रस्त ठरलेल्या राष्ट्रीय पात्रता सहपरीक्षा-पदवी २०२४ (नीट-यूजी २०२४) शी संबंधित सर्व याचिकांवर गुरुवारी निकाल दिला.दरम्यान, आजच्या सुनावणीत पेपरफुटी व्यापक प्रमाणावर झाली असेल तरच फेरपरीक्षा हाेईल, असा पुन्नरुच्चार सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केला.
प्रत्येक परीक्षा केंद्राचा स्वतंत्र निकाल जाहीर करावा, असे आदेश देत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी (२२ जुलै) होईल असेही सांगितले. ते म्हणाले, सोमवारी बिहार पोलीस आणि ईओडब्ल्यूचे अहवालही सादर केले जावेत. या सुनावणीवेळी एनटीएने न्यायालयाला सांगितले की, २४ जुलैपासून नीट-यूजीचे काऊन्सलिंग सुरू होईल.
नीट पेपर लीकप्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने एनटीएला महत्त्वाचे आदेश दिले आहेत. पेपर फुटला होता यात शंका नाही, पण फेरपरीक्षा होईल की नाही हे सर्वोच्च न्यायालय ठरवेल, अशी टिप्पणी न्यायालयाने केली आहे.तसेच बिहार पोलिसांनी आपल्या तपास अहवालाची प्रत सादर करावी, असे न्यायालयाने आदेश दिले आहेत.
देशात नीट पेपर लिक प्रकरणात लोखो विद्यार्थ्यांचे भवितव्य पणाला लागले आहे. गुरुवारच्या सुनावणीत न्यायालयाने सर्व विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेता येणार नाही. संपूर्ण परीक्षेवर पेपरफुटीचा विपरीत परिणाम झाला आहे, याला ठोस आधार असल्याशिवाय फेरपरीक्षेचा आदेश देवू शकत नाही, असे असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटले आहे. याचिकाकर्त्यांची बाजू मांडणारे वकील नरेंद्र हुडा यांना न्यायालयाने सांगितले की, पेपर लीक इतकी पद्धतशीर होती आणि त्यामुळे संपूर्ण परीक्षेवर परिणाम झाला हे सिद्ध केले पाहिजे, असेही न्यायालयाने म्हटले होते.
फेरपरीक्षा धेतली तर २३ लाखांपैकी केवळ १ लाख विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळेल. उर्वरीत २२ लाख विद्यार्थ्यांचे नुकसान होईल, असा युक्तीवाद याचिकाकर्त्यांची बाजू मांडणाऱ्या वकीलांनी केला होता. मात्र न्यायालयाने हा युक्तीवाद खोडून काढताना, संपूर्ण परीक्षेवर परिणाम झाल्याचा ठोस आधार घेऊनच फेरपरीक्षा घेण्यात यावी. पेपर लीक इतकी पद्धतशीर होती आणि त्यामुळे संपूर्ण परीक्षेवर परिणाम झाला हे सिद्ध केले पाहिजे, असेही न्यायालयाने म्हटले होते.
चिंता करण्यासारखी गोष्ट म्हणजे, नीट परीक्षा पेपरफुटी आणि परीक्षा यामधील कालावधी किती होता? जर कालावधी 3 दिवस असेल तर साहजिकच मोठा धोका आहे, असेही सरन्यायाधीशांनी यावेळी स्पष्ट केले. बिहारमधील हजारीबाग आणि पाटणा येथे पेपरफुटीचा प्रकार घडला आहे हे मान्य आहे. आम्हाला जाणून घ्यायचे आहे की या केंद्रावरील किती विद्यार्थी परीक्षेला पात्र ठरले आहेत. यावर एनटीएने स्पष्ट केले की, हजारीबाग आणि पाटणा येथील ८० उमेदवार वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत, असे एनटीएने खंडपीठास सांगितले.