
आव्हांडासह आणखी २२ जणांवर अटकेची टांगती तलवार
ठाणे : शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. आव्हाड यांच्यावर खोट्या गुन्ह्याचा कट रचण्याचा आरोप आहे. तसेच एका महिलेवर केलेल्या विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी तिच्यावर दबाव टाकल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यासह त्यांच्या दोन्ही वकिलासंहित २२ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात त्यांच्यावर अटकेचीही टांगती तलवार असल्याची माहिती आहे.
नेमका काय आहे आव्हाडांवरील विनयभंगाचा गुन्हा?
ठाण्यातील मुंब्रा वाय जंक्शन येथील उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा हा नोव्हेंबर २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. या सोहळ्यादरम्यान आव्हाड यांनी दोन्ही हातांनी पकडून बाजूला हटवल्याचा आरोप पीडित महिलेचा आहे. या प्रकरणी आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. या घटनेनंतर आव्हाड यांनी जुन्या घटनेवरून एकाला हाताशी धरून अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केल्याचा पीडित महिलेचा आरोप आहे.
या प्रकरणाच्या तपासात कोणताही पुरावा उपलब्ध न झाल्याने हा ॲट्रॉसिटीचा कट अयशस्वी ठरल्याचा आरोप पीडित महिलेचा आहे. तसेच आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांकडून कलम ३७०, ३७० (अ), ५०४, ३४, सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमन कलम ३, ४, ५, चे कलम ४, ६, १०, १२, १७ प्रमाणे पीटा, पॉस्कोचा गुन्हा दाखल केल्याचा पीडित महिलेचा आरोप आहे. तसेच हे आरोपही सिद्ध न झाल्याचे पीडित महिलेचं म्हणणं आहे.
यानंतर ठाणे सत्र न्यायालयाने 'बी' संमरी मंजूर करीत, या खोट्या गुन्ह्यातील फिर्यादी आणि साक्षीदारांवरच गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले. याच प्रकरणी रौनक आजम शेख (४२), शबाना शेख (४३),शाहिस्ता कुरेशी (३३),सिमरन सोधी (४०), शिवा जगताप, जितेंद्र आव्हाड व त्यांच्या इतर समर्थकांवर विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी मुंब्रा येथे राहणाऱ्या इस्टेट इजंट शबाना सोंधी यांना अटक करण्यात आली आहे. तर आव्हाड यांच्यासह इतरांना तातडीने अटक करा, अशी मागणी पीडित महिलेने पत्रकार परिषदेत केली आहे.