चालक व वाहकाने मद्यप्राशन केल्याचा प्रवाशांचा आरोप
यवतमाळ : आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi) पंढरपूरला (Pandharpur) निघालेल्या वारकऱ्यांवर काळाने घाला घातला आहे. काल रात्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या खासगी बसचा पनवेलजवळ (Panvel) भीषण अपघात झाला. या बसची ट्रॅक्टरला जोरदार धडक झाल्याने ही बस ३० ते ४० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला. वारकऱ्यांच्या बसचे हे प्रकरण ज्वलंत असतानाच आणखी एक अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे. यवतमाळमध्ये (Yavatmal) विठुरायाच्या दर्शनाला निघालेल्या एसटी बसचा भीषण अपघात (ST Bus Accident) झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. परंतु सातत्याने वाढत चाललेल्या अपघाताच्या प्रकरणांमुळे एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आषाढी एकादशी अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. अशातच वर्धा येथून वारकऱ्यांना घेऊन पंढरपूरकडे निघालेल्या बसला यवतमाळच्या पुसदजवळ अपघात झाला. ही एसटी बस वर्धा येथून वारकऱ्यांना घेऊन पंढरपूरच्या दिशेने निघाली होती. यवतमाळच्या पुसदजवळ बस येताच चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट डिव्हायडरला जाऊन धडकली. अपघातानंतर वेळीच एसटी जागेवरच थांबवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. परंतु जोरदार धडकेमुळे प्रवाशांना हादरा बसला.
चालक आणि वाहक दोघेही मद्यधुंद
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितनाही झाली नाही. मात्र, काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना प्राथामिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या बसचे चालक आणि वाहक दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते. या अवस्थेत त्यांनी एसटी चालवत असल्यामुळे हा भीषण अपघात घडला, असा आरोप प्रवाशांनी केला आहे.