खासदार नारायण राणे यांचे आवाहन
मुंबई : नव्याने पुढे आलेले काही नेते किरकोळ राजकीय फायदा नजरेसमोर ठेऊन दुहीचे आणि द्वेषाचे विष कालविण्याचे पाप करीत असून असले राजकारण थांबवा आणि सलोखा राखा, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री व भाजपा खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकल्याणकारी महाराष्ट्रामध्ये सध्या जाती-जातींमध्ये द्वेषाचे विष कालवून जातीय सलोखा धोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विविध विचारसरणीचे आणि त्यातही नव्याने पुढे आलेले काही नेते किरकोळ राजकीय फायदा नजरेसमोर ठेऊन दुहीचे आणि द्वेषाचे विष कालविण्याचे पाप करीत आहेत. सर्वसामान्यांच्या हितासाठी जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण करीत असल्याची बतावणी ही मंडळी करतात. संघर्षामध्ये शेवटी सर्वसामान्यांचे बळी जातात व नुकसान होते हे मात्र ते विसरतात.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक काळापासून जातीय सलोख्याचे वातावरण आहे आणि गावा-गावांमध्ये लोक गुण्यागोविंद्याने नांदतात. या वातावरणाला नख लावण्याचे प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत. सर्व जबाबदार राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातील जातीय सलोखा कायम रहावा यासाठी प्रयत्न करावेत असे मला वाटते, असे ट्विट माजी केंद्रीय मंत्री व भाजपा खासदार नारायण राणे यांनी केले आहे.