विधानसभेसाठी ‘या’ दोन जागांवर चर्चेविनाच ठोकला दावा
अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) वेळी जागावाटप करताना महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) ठाकरे गटाने (Thackeray Group) चर्चा न करता सांगलीच्या जागेवर आपला उमेदवार जाहीर केला होता. यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये शीतयुद्ध सुरु झाले होते. यावेळेसही विधानसभा निवडणुकांच्या (Vidhansabha Election) वेळी ठाकरे गटाकडून पुन्हा तीच चूक ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) केली आहे. संजय राऊत यांनी मविआसोबत चर्चेविनाच श्रीगोंदा आणि अहमदनगर शहरची जागा ठाकरे गट लढवणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे मविआमध्ये वादाची ठिगणी पडण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर येथील श्रीगोंदा येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदार संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांनी विधानसभेसाठी श्रीगोंदा आणि अहमदनगर शहरच्या जागेवर दावा ठोकला. मात्र महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चाही सुरू झाली नसताना संजय राऊतांनी दोन जागांवर दावा ठोकल्याने मविआमध्ये वाद सुरु होऊ शकतात.
संजय राऊत यांनी अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर असताना श्रीगोंदा येथील जागा शिवसेना उपनेते साजन पाचपुते लढणार असल्याचे भाषणात जाहीर केले आहे. तसेच अहमदनगर शहर विधानसभेची जागा शिवसेनेचीच असून त्या ठिकाणीही तयारीला लागा अशा सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. त्या ठिकाणी आलेल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून नगर शहर विधानसभा मतदार संघ आपलाच आहे त्यासाठी कामाला लागा उमेदवार नंतर ठरवू असा संदेश संजय राऊत यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिला. त्यामुळे आता सांगलीप्रमाणे पुन्हा एकदा मविआमध्ये वादाची ठिणगी पडणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.