Sunday, May 18, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजराजकीय

CM Eknath Shinde : आरक्षणाबाबत दुटप्पी भूमिकेमुळे विरोधकांनी बैठकीला येणं टाळलं!

CM Eknath Shinde : आरक्षणाबाबत दुटप्पी भूमिकेमुळे विरोधकांनी बैठकीला येणं टाळलं!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला


मुंबई : सध्या राज्यभरात आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. ओबीसी आणि मराठा समाजाच्या परस्परविरोधी मागण्यांमुळे राज्य सरकार कोंडीत सापडलं आहे. त्यातच विरोधक केवळ सरकारवर टीका करत आहेत. मात्र, त्यांची भूमिका दुटप्पी असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. 'विरोधकांची भूमिका दुटप्पी असल्यामुळे त्यांनी बैठकीला येण्याचं टाळलं', असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.


मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आरक्षणासंदर्भात १० टक्के आरक्षण इतर कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी न करता दिले आहे. कोर्टाने स्टे दिलेला नाही. जस्टिस शिंदे समिती काम करत आहे. कालच्या बैठकीत अनेक मुद्दे आलेत, त्यावर काम सुरू असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.


बारामतीत आज अजित पवार गटाचा मेळावा पार पडला. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, आज पंढरपूरमधील तयारीचा आढावा घेणार आहोत. लाखो वारकरी संप्रदायाची आषाढी एकादशीच्या दिवशी गैरसोय नको, म्हणून प्रत्येक दिंडीला २० हजार रुपये देतोय, तसंच टोल माफी यंदा केली आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.



विशाळगडावरील मोहिमेला लागलं हिंसक वळण


विशाळगडासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, माझं जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालं आहे. संभाजीराजे यांच्याशी देखील याबाबत चर्चा झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड किल्ले आपले ऐश्वर्य आहेत. शासन याबाबत नक्की विचार करत आहे. या गडाबद्दल काही गोष्टी न्यायालयात असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.



लोकसभेनंतर मोदींचा पहिला मुंबई दौरा


तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी प्रथमच मुंबईत आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. काल अनेक प्रकल्पांचं भूमिपूजन मोदी साहेबांच्या हस्ते झालं. १० लाख लोकांना नोकरी मिळेल, हा सरकारचा ऐतिहासिक निर्णय आहे. विकास आणि विश्वास या दोघांचा ताळमेळ कालच्या कार्यक्रमात झाल्याचं त्यांनी म्हटलं. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपर्यंत आम्ही आणखी काम करू आणि जिंकून येऊ, असा विश्वास देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला.



लाडकी बहीण योजनेत कोणताही गोंधळ नाही


लाडकी बहीण योजनेसंदर्भात (Ladki Bahin Yojana) काहीही गोंधळ झालेला नाही. सगळ्या अटी सुटसुटीत केल्या असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. जुना डाटाबेस वापरणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. योजना अगदी सुटसुटीत झालेली आहे, यात कुठलीही गडबड नाही. लाडकी बहिण योजना प्रसिद्ध होईल, याची सर्व तरतूद सरकारने केली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

Comments
Add Comment