आशिष शेलार यांची ठाकरे गटावर सडकून टीका
मुंबई : लोकसभेत (Loksabha) पराभव झालेली महायुती विधानपरिषदेत (Vidhanparishad) मात्र अव्वल ठरली. भाजपचे पाचही उमेदवार निवडून आले तर महायुतीचेही (Mahayuti) ९ उमेदवार निवडून आले. महाविकास आघाडीच्या (Mahavikaas Aghadi) दोन उमेदवारांचा विजय झाला तर शेकापचे जयंत पाटील (Jayant Patil) यांचा मात्र पराभव झाला. यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला आहे. ठाकरे गटाने जयंत पाटील यांचा ठरवून पराभव केला. आपल्यासोबत असणाऱ्या छोट्या छोट्या पक्षांना उबाठा संपवण्याचं काम करतेय, अशी सणसणीत टीका शेलारांनी केली. तसेच ‘छोट्या पक्षांनो तुम्ही अजगराच्या विळख्यात सापडला आहात’, असा इशाराही शेलारांनी दिला.
विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून सुरुवातीला काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि शेकापचे जयंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. ११ जागांसाठीच्या निवडणुकीत पुरेशी मते नसतानाही शिवसेना ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी जाहीर केली होती. यावरून शेकापचे जयंत पाटील यांचा उबाठाने ठरवून पराभव केल्याची टीका आशिष शेलार यांनी केली आहे.
आशिष शेलार यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करत म्हटले आहे की, विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे पाचही उमेदवार विजयी! सर्व विजेत्या उमेदवारांचे अभिनंदन!! महाराष्ट्र पाहतोय… लोकसभा निवडणुकीत उबाठाने स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींना मदत केली नाही. मुंबई शिक्षक मतदारसंघात महाआघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिक्षक भारतीचे नेते कपिल पाटील यांच्या उमेदवाराचा उबाठाने पराभव केला. गम्मत म्हणजे कपिल पाटलांच्या समाजवादी गणराज्य पक्षाची स्थापनाच श्रीमान उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली होती. तर आता विधान परिषद निवडणुकीत ही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेकापचे उमेदवार शेतकरी नेते जयंत पाटील यांचा उबाठाने ठरवून पराभव केला. सोबत असलेल्या छोट्या पक्षांना संपवण्याचे काम कोण करतोय…? महाराष्ट्र पाहतोय. छोट्या पक्षांनो तुम्ही अजगराच्या विळख्यात सापडला आहात, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.
विधान परिषद निवडणूकीत भाजपाचे पाचही उमेदवार विजयी !
सर्व विजेत्या उमेदवारांचे अभिनंदन !!महाराष्ट्र पाहतोय…
◆लोकसभा निवडणुकीत उबाठाने स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींना मदत केली नाही.
◆मुंबई शिक्षक मतदार संघात महाआघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिक्षक भारतीचे नेते कपिल पाटील… pic.twitter.com/4ax2PdKyMl
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 13, 2024
विधानपरिषदेत कोणते उमेदवार विजयी?
विधान परिषद निवडणुकीत महायुतीतून भाजपच्या पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके आणि सदाभाऊ खोत यांचा विजय झाला. शिंदेंच्या शिवसेनेचे कृपाल तृमाने आणि भावना गवळी तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे विजयी झाले. महाविकास आघाडीतून काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांचा विजय झाला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर उभे असलेले शेकापचे जयंत पाटील यांचा या निवडणुकीत पराभव झाला.