७ भारतीयांसह ६५ जण बेपत्ता
काठमांडू : नेपाळच्या चितवन परिसरात झालेल्या भूस्खलनाच्या (Nepal landslide) दुर्घटनेमुळे दोन बस त्रिशूली नदीत वाहून गेल्या. या बसमध्ये असलेले ६५ जण बेपत्ता झाले आहेत. यात ७ भारतीयांचाही समावेश आहे. काठमांडूहून (Kathmandu) निघालेली एंजल बस आणि गौरकडे जाणारी गणपती डिलक्स बसचा आज पहाटे ३.३० च्या सुमारास अपघात झाला. नारायणघाट-मुगलिंग रस्त्यालगत सिमलताल परिसरात दरड कोसळल्याने प्रवाशांसह दोन्ही बस नदीत वाहून गेल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, बेपत्ता प्रवाशांमध्ये सात भारतीय नागरिकांचा समावेश आहे. एंजेल बसमध्ये २४ तर गणपती डिलक्समध्ये ४१ जण होते. गौरकडे जाणाऱ्या बसमधील तीन प्रवासी वाहनातून उडी मारून पळून जाण्यात यशस्वी झाले, असे पोलिसांनी सांगितले. चितवनचे मुख्य जिल्हा अधिकारी इंद्रदेव यादव यांनी सांगितले की, “बचावकार्य सुरू असून, भूस्खलनाचा ढिगारा हटवला जात आहे. बचावकार्यासाठी पोलीस आणि सशस्त्र दलही सहभागी झाले आहेत.”
नेपाळचे पंतप्रधान काय म्हणाले?
नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल उर्फ ‘प्रचंड’ म्हणाले की, “नारायणगड-मुग्लिन मार्गावर भूस्खलनात बस वाहून गेल्याच्या दु:खद घटनेने मला खूप वाईट वाटले. मी स्थानिक प्रशासनासह सरकारच्या सर्व एजन्सींना प्रवाशांचा शोध आणि प्रभावीपणे सुटका करण्याचे निर्देश दिले आहे” असे प्रचंड यांनी X वर पोस्ट शेअर करून सांगितले. देशाच्या विविध भागात पूर आणि भूस्खलनामुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.