
पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याचा धोका
मुंबई : महाराष्ट्रासह मुंबईत (Mumbai Rain) पावसाने जोर धरला आहे. त्यातच सोमवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा राज्यभरात हजेरी लावली आहे. रात्रभर मुंबईसह अनेक उपनगरांत जोरदार पाऊस झाल्यामुळे रस्त्यांना नदीचे स्वरुप आले आहे. यामुळे पुढील काही दिवस मुंबईकरांसाठी धोक्याचे ठरु शकतात, असा अंदाज हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मुंबईत मध्यम आणि मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. तर, पुढच्या आठवड्यात १७,१८ आणि १९ जुलै रोजी जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. या पावसामुळे मुंबईत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात पाऊस मुंबईसह उपनगरात धुमाकूळ घालणार असल्यामुळे हवामान विभागाने मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Rain Alert)
'या' जिल्ह्यांना अलर्ट
या आठवड्यातील शुक्रवार, शनिवार आणि रविवार एकूण ३०० मिमी पाऊस पडू शकतो. त्यामुळे शनिवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रविवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना तर सोमवारी, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, आज पहाटेदेखील मुसळधार पाऊस बरसत असल्यामुळे हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.