भाजपा आमदार नितेश राणे यांची विधानसभेत मागणी
मुंबई : बेस्ट उपक्रमाचे मुंबई महापालिकेत विलीनीकरण करण्याची नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी सोमवारी विधानसभेत जोरदार मागणी केली. बेस्टच्या सर्व समस्या सोडवायच्या असतील तर एकमेव चांगला पर्याय म्हणजे बेस्टचे मुंबई महापालिकेत विलीनीकरण हाच एक उपाय असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत (Uday Samant) म्हणाले की, असा प्रस्ताव जर शासनाच्या विचाराधीन असेल, तर यावर जरूर विचार करण्यात येईल. मुंबईतील बेस्टच्या भंगार बस विक्रीप्रकरणी गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला. त्याची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी माहिती मंत्री सामंत यांनी दिली.
सदस्य लहू कानडे यांनी यासंदर्भात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर बोलताना आमदार नितेश राणे यांनी बेस्ट उपक्रमाचे मुंबई महापालिकेत विलीनीकरण व्हावे अशी मागणी केली.
राहुल गांधी यांनी वारीत सहभागी होऊ नये
- काँग्रेस नेते राहुल गांधी पहिल्यांदाच वारीत सहभागी होत आहेत. यावरून भाजपा नेते आक्रमक झाले असून, त्यांना विरोध सुरू झाला आहे. “राहुल गांधी यांनी हिंदू समाजाविषयी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांनी वारीत सहभागी होऊ नये,” असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला.
- आमदार नितेश राणे यांनी देखील राहुल गांधी यांना विरोध करत, काही गोष्टी सुनावल्या आहेत.”जसे मणिपूरला जाऊन फोटो काढले, तसे आमच्या वारीमध्ये येऊन फोटो काढू नका. तशी हिंमत देखील त्यांनी करू नये. हिंदू समाज हा त्यांच्या प्रत्येक वक्तव्यावर चिडलेला आहे म्हणून त्यांना स्वतःच्या सुरक्षेच्या विषयी काळजी असेल तर त्यांनी वारीमध्ये चालायला येऊ नये,” असा इशारा आमदार राणे यांनी दिला.
हिट अॅण्ड रन प्रकरणात महायुतीकडून तत्परतेने कारवाई
पुण्यात आणि वरळी येथे हिट अॅण्ड रनची प्रकरणे समोर आली. परंतु या दोन्ही प्रकरणांतील आरोपींना अटक करण्यात आली. या उलट महाविकास आघाडी सरकारच्या काळात अभिनेत्री दिशा सालीयन, अभिनेता सुशांतसिंह यांच्या मृत्यू प्रकरणातील आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न तत्कालिन सरकारने केला. एवढेच नव्हे तर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे विरोधक कितीही आरोप करत असले तरी, हिट अॅण्ड रन प्रकरणात महायुती सरकारने केलेली तत्परतेची कारवाई निश्चित जनतेला दिलासा वाटणारी आहे, अशी प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी दिली.