पंधरा ते वीस मिनिटे लोकल उशिरा
मुंबई : मान्सून (Monsoon) सुरु होऊनही मनासारखा न झालेला पाऊस परवा रात्री मात्र मुंबईसह ठाणे आणि उपनगरांत धो धो कोसळला. मुसळधार पावसाने (Heavy rainfall) मुंबईला झोडपून काढलं आणि अवघ्या काही तासांतच मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं. काल मध्य (Central Railway) आणि हार्बर रेल्वे (Harbour railway) मार्गावर तर रेल्वेसेवा ठप्प झाली. यानंतर रात्री पुन्हा एकदा मुसळधार पाऊस झाला. मात्र, आज पहाटेपासून पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. असं असलं तरी मध्य रेल्वेचं रडगाणं सुरुच आहे. मध्य रेल्वे पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होत आहे.
मुंबई आणि उपनगरात झालेल्या मुसळधार पावसामुळे काल विस्कळीत असलेली मध्य रेल्वेची वाहतूक आज सुरू तर झाली मात्र ती उशिराने धावत आहे. आज सकाळच्या सुमारास कल्याण, बदलापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. नऊ वाजताच्या सुमारास रेल्वे थोडीफार पूर्व पदावर आली असली तरी पाच ते दहा मिनिटांनी उशिराने धावत होती.
लांब पल्ल्याच्या गाड्या तर तासभर उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. कल्याण रेल्वे स्थानकात लांबच्या प्रवासासाठी निघालेले प्रवासी ताटकळत आहेत. तर पश्चिम रेल्वे सुरळीत सुरु आहे.
मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी
हवामान खात्याने मुंबई महानगराला पावसाचा रेड अलर्ट जारी केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज (मंगळवार दिनांक 9 जुलै २०२४) रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने याबाबत घोषणा केली. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा मदत सेवा क्रमांक १९१६ यावर संपर्क साधा, अशी सूचनाही प्रशासनाने नागरिकांना केली आहे.