रुग्णांची संख्या ३६५ वर, आरोग्य विभागाकडून सतर्कतेचा इशारा
नाशिक : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार (Maharashtra Rain) पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. ऐन पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, हिवताप असे अनेक आजार डोकावत असतात. पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती आणि कोल्हापूरमध्ये डेंग्यूच्या (Dengue) रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यातच नाशिक शहरात डेंग्यूच्या साथीने थैमान घातले आहे. नाशिकमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेकडून (Health Department) सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये आठवडाभरात ९६ नवे रुग्ण आढळले आहेत. शहरातील सिडको विभागात डेंग्यूचे ३८ रुग्ण आढळून आले आहेत. नाशिकरोड विभागात २१, नाशिक पूर्व विभागात १५, नाशिक पश्चिम आणि पंचवटी विभागात प्रत्येकी १० तर सातपूर विभागात २ रुग्ण आढळले आहेत. यासोबत डेंग्यूच्या एकूण रुग्णसंख्येचा आकडा ३६५ वर पोहचला आहे.
दरम्यान, आरोग्य विभागाने वेळेतच डेंग्यूसंदर्भात काही दखल न घेतल्यामुळे आता आरोग्य यंत्रणेला डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यात हवे तसे यश मिळत नसल्याचे दिसून येत आहे. सध्या पालिका प्रशासनाकडून डेंग्यू निर्मूलनासाठी जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. तर डेंग्यूच्या डासांच्या उत्पत्तीस कारणीभूत ठरणाऱ्या आस्थापना, व्यक्तींना नोटीस देखील पाठवण्यात आल्या आहेत.
एका बेडवर दोन रुग्णांचे उपचार
अमरावती जिल्ह्यातही साथीच्या रोगांनी डोके वर काढले आहे. सध्या अमरावती जिल्हात डेंग्यूचे ७२ आणि चिकनगुणीयाचे ३२ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांची गर्दी झाली आहे. त्यामुळे अमरावतीतील जिल्हा रुग्णालयात विविध आजाराचे रुग्ण दाखल झाले असून एका बेडवर दोन रुग्ण उपचार घेत आहेत.