कणकवली : खारेपाटण बाजारपेठेत पूरस्थिती निर्माण होऊन झालेल्या नुकसानीची भाजप नेते, केंद्रीय माजी मंत्री ,खासदार नारायण राणे यांनी मंगळवारी प्रत्यक्ष पाहणी केली. ज्या कुटुंबांचे नुकसान झाले. त्यांच्याशी त्यांनी थेट संवाद साधला. अधिकाऱ्यांनी नुकसान भरपाईचे पंचनामे तातडीने करून शासनाकडे त्याचा अहवाल पाठवा, असे आदेश दिले. पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून सुख नदी पात्रातील गाळ काढण्याचे काम उन्हाळ्यात युद्ध पातळीवर केले जाईल, असे आश्वासन यावेळी खासदार नारायण राणे यांनी दिले.
मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये प्रामुख्याने कणकवली तालुक्यातील खारेपाटण भागात मोठ्या प्रमाणात पाणी वाढले होते. येथील बाजारपेठेत मेडिकल, भूसारी दुकाने, हॉटेल्स, कापड दुकाने, बसस्थानक, मोबाईल शॉप, हार्डवेअर तसेच एका मंदिरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले होते. याच पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी – सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी खारेपाटण येथे भेट देउन नुकसानग्रस्त भागाची पहाणी केली. प्रशासकीय अधिकऱ्यांकडून देखील उद्भवलेल्या आपत्तीची माहिती घेतली. बाजारपेठेतील दुकानदारांशी खासदार नारायण राणे यांनी चर्चा करुन तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासनाला सूचना केल्या.
यावेळी खासदार नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, प्रशासनाला नुकसान भरपाईच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे खासदार नारायण राणे यांनी सांगितले. भविष्यात पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नियोजन करून येणाऱ्या वर्षात मे महिन्याच्या आधी नदीचा गाळ काढला जाईल. कोणत्याही सूचना न देता सोडण्यात येणारे धरणाचे पाणी सूचना केल्याशिवाय सोडू नये यासाठी संबंधितांना सूचना केल्या जातील. बंधाऱ्यासाठी प्रयत्न करून येणाऱ्या वर्षात ते पूर्ण करून घेऊ, असे आश्वासन खारेपाटण वासीयांना खासदार नारायण राणे यांनी दिले.
यावेळी नुकसानग्रस्तांचे मेडिकल-आसिफ मनाजी, तळगावकर स्टेशनरी – संतोष तळगावकर, पान स्टॉल – अनंतराव गांधी, पद्मावती हार्डवेअर – केतन आलते, विष्णू मंदिर, पवित्र कावळे यांच्या घराचे नुकसान झाले. त्याची खासदार नारायण राणे यांनी पाहणी केली. इतर नुकसानग्रस्तांचें तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले.