सोलापूर : पंढरपुरात दर्शन रांगेत हजारो भाविक काल मंदिरात दिवसभर व्हीआयपीकडून झटपट दर्शनासाठी गर्दी केल्याने दर्शन रांगेतील गोरगरीब भाविकांना १४ तासापेक्षा जास्त वेळ लागला होता . यातच रात्री पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने भाविकांचे मोठे हाल झाले होते.
संतप्त भाविकांची ही व्यथा समोर आल्यानंतर मंदिर प्रशासन खडबडून जागे झाले . आजपासून कोणत्याही व्हीआयपी भाविकांना देवाच्या झटपट दर्शनासाठी न सोडल्याने काळ तासंतास एकाचजागी थांबलेली दर्शन रांग सोमवारी जोराने धावू लागली आणि केवळ ४ ते ५ तासात भाविकांना देवाचे दर्शन होऊ लागले.
विठ्ठल दर्शनासाठी आषाढी काळातील १० दिवस संपूर्ण व्हीआयपी दर्शन बंद करण्याची मागणी काल माझाने लावून धरली होती . काळ दिवसभर रांगेत ताटकळत थांबलेल्या भाविकांना रात्री पावसाने झोडपून काढले. दर्शन रांगेतील पत्रे गळू लागल्याने भाविक रात्रभर चिंब भिजून दर्शन रांगेत अडकून पडला होता . काल भाविकांनी थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन करीत आषाढी काळात येणाऱ्या भाविकांना आमच्याप्रमाणे दर्शन रांगेतून दर्शन घेऊ द्या, अशी मागणी केली होती.
यानंतर वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हलली आणि अखेर सोमवारी सकाळीपासून मंदिर प्रशासनाने कोणत्याही व्हीआयपी भाविकाला घुसखोरी करून झटपट दर्शन करू दिले नाही . यामुळे काल गोपाळपूर पत्रा शेडमध्ये ८ ते १० तास अडकलेली रांग सोमवारी सकाळपासून पळू लागली आणि दर्शन रांगेतील भाविकांना केवळ ४ ते ५ तासात दर्शन मिळू लागले.