पुणे : आंतरधर्मीय विवाहामुळे उद्भवलेल्या संतापातून रांधे (ता. पारनेर) येथील एका तरुणाचा मोशी (भोसरी, पुणे) येथील औद्योगिक परिसरात खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत तरुणासोबत आंतरधर्मीय विवाह केलेल्या मुलीच्या भावाने नातेवाईकांच्या मदतीने हा खून केल्याचे उघड झाले आहे. तीन आठवड्यांपूर्वी (१५ जून) घडलेल्या या घटनेचा छडा लावण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी यश मिळवले आहे.
हत्या झालेल्या तरुणाचे नाव आमिर शेख आहे. आमिरच्या हत्येप्रकरणी पंकज विश्वनाथ पाईकराव, गणेश दिनेश गायकवाड, सुशांत गोपाळा गायकवाड, सुनील किसन चक्रनारायण यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी पंकज पाईकराव, सुशांत गायकवाड आणि सुनील चक्रनारायण यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या झोन तीनचे पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, रांधे येथील आमिर शेख आणि त्याच्या शेजारी राहणा-या मुलीने चार महिन्यांपूर्वी आळंदी (पुणे) येथे आंतरधर्मीय विवाह केला होता. त्यानंतर ते मोशी (भोसरी, पुणे) येथे राहत होते. आमिर खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता. बहिणीने आंतरधर्मीय विवाह केल्याच्या संतापातून तिच्या भावाने मेहुणा आणि नातेवाईकांच्या मदतीने १५ जून रोजी आमिरचा गळा आवळून खून केला आणि नंतर त्याचा मृतदेह आळंदी-चाकण रस्त्यावरील निर्जन ठिकाणी नेऊन जाळला. दरम्यान, आमिरच्या पत्नीने पती बेपत्ता झाल्याची तक्रार भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली होती. आमिरच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्यावर पोलिसांनी तपास करून खुनाचा उलगडा केला.
आमिर शेख आणि त्याच्या शेजारी राहणा-या मुलीमध्ये प्रेमसंबंध होते. त्यांच्या कुटुंबांनी २० वर्षांपासून शेजारी राहत होते आणि त्यांच्या संबंधात सलोखा होता. मात्र, प्रेमविवाहामुळे मोठी दरी निर्माण झाली.