मुसळधार पावसामुळे घडली दुर्दैवी घटना
मुंबई : मुंबईसह ठाणे आणि उपनगरांत काल रात्रीपासून मुसळधार पाऊन सुरु आहे. काही ठिकाणी पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचलं आहे. मध्य व हार्बर रेल्वेसेवाही ठप्प झाली आहे. त्यातच नवी मुंबईतून मुसळधार पावसामुळे एक दुर्दैवी गटना समोर आली आहे. पावसामुळे लोकल उशिराने धावत असल्याने कामावर वेळेत पोहोचण्यासाठी लोक जीवाची पर्वा न करता लोकल पकडत आहेत. अशा घाईतच एक महिला धावत्या रेल्वेमधून थेट रुळावर पडली, तिचा जीव वाचला मात्र गुडघ्यापासून दोन्ही पाय तुटले आहेत. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठिकठिकाणी ट्रॅकवर पाणी साचल्याने लोकसेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. मिळेल ती लोकल पकडून प्रवासी जीवघेणा प्रवास करीत आहेत. त्यातच सीबीडी बेलापूर स्टेशनजवळ एक महिला धावत्या ट्रेनमधून अचानक खाली पडली. पनवेलवरून ठाण्याकडे जाणारी लोकल सकाळी नऊच्या दरम्यान बेलापूर सीबीडी रेल्वे स्टेशनकडे येताना एक महिला पाय घसरून रुळावर पडली. त्यामुळे महिलेच्या अंगावरून रेल्वेचा पहिला डबा गेला. या घटनेत महिलेचे दोन्ही पाय गुडघ्यापासून तुटल्याची माहिती आहे.
घटनेनंतर रेल्वेस्थानकात मोठा गोंधळ उडाला. प्रवाशांनी या घटनेची माहिती तातडीने रेल्वे पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. सध्या ही महिला गंभीर जखमी असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, मुंबईत पावसाचा जोर ओसरला असून लोकलसेवा पूर्वपदावर येत आहेत. त्यामुळे प्रवाशांनी ट्रेनने प्रवास करताना घाईगडबड करू नये. धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा तसेच उतरण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.