मुंबईतील अतिवृष्टीमुळे विधानसभा कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता
मुंबई : मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा फटका रस्तेवाहतुकीसह रेल्वेसेवेला देखिल बसला आहे. मुंबई लोकल प्रमाणेच काही लांब पल्ल्याच्या गाड्या देखील रखडल्या आहे. सर्वसामान्यांची त्यामुळे आज मोठी गैरसोय होत आहे.
आज विदर्भ एक्सप्रेसने मुंबईत सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी येणार्या आमदार अमोल मिटकरी आणि मंत्री अनिल पाटील यांनाही या पावसाचा फटका बसला.
विशेष म्हणजे अनिल पाटील हे राज्याचे आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन मंत्री आहेत. या दोघांना कुर्ला ते दादर दरम्यान ट्रेन रखडल्याने ट्रॅक वरून चालण्याची नामुष्की आली.
काहीवेळापूर्वी अमोल मिटकरी आणि अनिल पाटील यांचा एक व्हीडिओ समोर आला. यामध्ये अमोल मिटकरी त्यांच्या परिस्थितीबाबत माहिती देताना दिसत आहेत. आणखी आठ ते दहा आमदार आम्ही असलेल्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये अडकून पडले आहेत. पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे आज आम्ही वेगळा अनुभव घेतोय. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा अंतिम आठवडा आहे. रेल्वेची वाहतूक लवकर सुरळीत होईल, अशी अपेक्षा आहे, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले. काहीवेळ पायपीट केल्यानंतर आता आमदार अमोल मिटकरी आणि मंत्री अनिल पाटील कुर्ला ईस्ट नेहरूनगर पोलीस चौकीत येऊन बसले आहेत. मात्र, पावसामुळे रस्त्यावरही वाहतूक कोंडी असल्याने त्यांना लगेच मुंबईच्या दिशेने रवाना होणे शक्य नाही. त्यामुळे ते आता अधिवेशनाला कसे पोहचणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला सुरुवात होत आहे. त्यासाठी महालक्ष्मी एक्स्प्रेसने अनेक आमदार मुंबईत येत होते. मात्र, रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने महालक्ष्मी एक्सप्रेस मध्य रेल्वेच्या अंबरनाथ स्थानकाजवळ अडकून पडली आहे. या ट्रेनमध्ये अनेक आमदार अडकून पडल्याची माहिती आहे.
मुंबईतील अतिवृष्टीमुळे विधिमंडळाच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे आमदार व मंत्री पोहचले नसल्यास कामकाज काही वेळेसाठी स्थगित केले जाईल, असे सांगितले जात आहे. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतील, असे सांगितले जात आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे आज नाशिक मुंबई महामार्गावरच्या खड्ड्यांच्या अनुषंगाने होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या दालनात बैठकीचा आयोजन केले होते. बैठकीसाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, मुसळधार पावसामुळे अनेक नेते पोहोचू शकत नसल्यामुळे ही बैठक रद्द करण्यात आली आहे उद्या किंवा परवा या बैठकीचा आयोजन करण्यात येणार आहे.