Tuesday, April 22, 2025
Homeब्रेकिंग न्यूजCM Eknath Shinde : गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

CM Eknath Shinde : गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करा : एकनाथ शिंदे

अजित पवार यांनीही ट्विट करत केले आवाहन

मुंबई : मुंबईत काल रात्रीपासून कोसळत आलेल्या मुसळधार पावसाने (Heavy rainfall) चांगलंच थैमान घातलं असून गेल्या ६ तासांत तब्बल ३०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अचानक मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने मुंबईतील रस्ते जलमय झाले आहेत. सखल भागात पाणी शिरल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं आहे. लोकल ट्रेनला देखील या पावसाचा मोठा फटका बसला आहे. रेल्वे रुळावर पाणी साचल्याने मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा ठप्प आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत मुंबईतील परिस्थितीबाबत सरकारकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची माहिती दिली.

“मुंबईत सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली असून रेल्वे मार्गावरील वाहतूकही बाधित झाली आहे. ट्रॅकवरील पाणी काढण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे”, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं आहे.

“लवकरच वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश मी दिले आहेत. गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. तसेच मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करावे”, असं आवाहनही मुख्यमंत्री शिंदेंनी मुंबईकरांना केलं आहे.

अजित पवार यांचे मुंबईकरांना आवाहन

मुंबईतील पावसाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील ट्वीट करत माहिती दिली आहे. “काल रात्री मुंबईत सहा तासांमध्ये ३०० मिमी पाऊस पडला आहे. हा मुंबईत वर्षभरात जेवढा पाऊस पडतो त्याच्या १० टक्के पाऊस आहे. भारत आणि जगभरातील शहरांप्रमाणेच मुंबईलाही हवामान बदलाचा त्रास सहन करावा लागत आहे”, असं अजित पवार म्हणाले.

“हवामान बदलामुळे भविष्यात येणाऱ्या पर्यावरणीय समस्या लक्षात घेऊन आपण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. वर्षातील ३६५ दिवस दुष्काळ, पूर, वादळ यांचा सामना करण्यासाठी आपण योग्य ती पावले उचलली पाहिजे. त्यासोबतच अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजे”, असंही अजित पवार म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -