लखनऊ : काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) हाथरसमध्ये भोलेबाबांच्या सत्संगात चेंगराचेंगरी (Hathras Stampede) होऊन भीषण दुर्घटना घडली होती. यामध्ये १२१ जणांचा मृत्यू झाला असून १०० जण जखमी झाले होते. मात्र या दुर्घटनेनंतर नारायण साकार हरि उर्फ भोलेबाबा (Bholebaba) फरार झाले होते. पोलीस या फरार भोलेबाबाचा शोध घेत असताना अनेक प्रकार उघडकीस येत होते. अशातच फरार भोलेबाबा पहिल्यांदाच माध्यमांच्या समोर आला असून त्याने हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणाबाबत प्रतिक्रिया दिली. त्यासोबत हाथरस दुर्घटनेमधील मृत परिवाराच्या लोकांना मदत करणार असल्याचेही त्याने म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हाथरस प्रकरणातील भोलेबाबा दुर्घटना झाल्यापासून अज्ञातवासात असून या घटनेतील मुख्य आयोजक फरार होता. सध्या उत्तर प्रदेश पोलिसांनी दुर्घटनेतील मुख्य आयोजक देवप्रकाश मधुकर याला अटक केली आहे. तर भोलेबाबानेही पहिल्यांदाच माध्यमांच्या समोर येऊन आपली प्रतिक्रिया मांडली आहे.
काय म्हणाला भोलेबाबा?
मंगळवार २ जुलै रोजी घडलेल्या हाथरस प्रकरणात १२१ जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी देखील झाले. याप्रकरणानंतर भोलेबाबांनी शोक व्यक्त केला. त्यासोबत सर्वांनी शासनावर विश्वास ठेवावा. या प्रकरणात दोषी असणाऱ्यांना सोडले जाणार नाही. मृत परिवाराच्या लोकांनाही मदत केली जाणार असल्याचे आश्वासन भोलेबाबांनी यावेळी दिले.
मुख्य आयोजकाला अटक
हाथरस दुर्घटनेतील प्रमुख आयोजक आणि मुख्य सेवेकरी देवप्रकाश मधुकर फरार झाला होता. त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी एक लाख रूपयांचे बक्षिसही जाहीर केले होते. परंतु देवप्रकाशने स्वतःहून पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर आज त्याला कोर्टासमोर हजर केले जाणार आहे.