मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय संघाने वेस्ट इंडिजच्या बारबाडोस येथील अंतिम सामन्यात द. आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत इतिहास रचला. टीम इंडियाच्या विजयाचे शिलेदार असलेल्या भारतीय संघातील ४ मुंबईकर खेळाडूंचा शुक्रवारी महाराष्ट्राच्या विधिमंडळात सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणात सूर्यकुमार यादवाच्या कॅचचे वर्णन करताना, २ वर्षांपूर्वी केलेल्या बंडाची आठवणही सांगितली. सूर्यकुमार यादवचा कॅच जसा विसरता येणार नाही, तसेच २ वर्षांपूर्वी आम्ही काढलेली विकेटही विसरता येणार नाही,असे म्हणत नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला. दरम्यान, टीम इंडियाला ११ कोटी रुपयांचे बक्षीसही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात भाषण करताना सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराज की जय.. भारत माता की जय… असा जयघोष केला. विश्वविजयी भारतीय संघाचे अभिनंदन करुन संघाला शुभेच्छा दिल्या. कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे यांचे महाराष्ट्र सरकारच्यावतीने मनापासून स्वागत करतो, असे शिंदे यांनी म्हटले.
टी २० क्रिकेट वर्ल्डकप जिंकणाऱ्या टीमचा आज मुंबईतील विधीमंडळात स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषद सभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह सर्व आमदार उपस्थित होते.
सूर्यकुमार यादव याने ज्या प्रकारे तो झेल घेतला तो घेताना सीमारेषेपार त्याचा पाय जरी टेकला असता तरी आज आपल्याला हा दिवस पाहायला मिळाला नसता. त्यामुळे सूर्यकुमार यादवचे खूप खूप अभिनंदन. संपूर्ण भारतीयांचे लक्ष तुझ्याकडे लागून होते. रोहितने सांगितलेच की तो तू घेतला नसतास तर तुला बघितले असतेच. पण केवळ रोहितनेच नव्हे तर आम्ही सर्वांनीच तुला बघितले असते. आमचे लोक फार वेडे आहेत जिंकल्यानंतर इतका उदो उदो करतात आणि हारल्यानंतर दगड मारायला कमी करत नाहीत. आपल्याकडे खिलाडूपणा पहायला मिळत नाही. – उपमुख्यमंत्री अजित पवार
या कार्यक्रमात भाषण करण्यासाठी रोहित शर्मा ज्यावेळी आला तेव्हा सर्व आमदारांनी त्याचा जयघोष केला. मुंबईचा राजा रोहित शर्मा अशा घोषणांनी सभागृह निनादून गेले. रोहितने त्याचे भाषण मराठीत केले. आपल्या भाषणाची सुरूवात त्याने सर्वांना मोठा नमस्कार असे म्हणून केली. सीएम सर धन्यवाद तुम्ही आम्हाला इथे आमंत्रित केले. बर वाटले सर्वांना पाहून. सीएम साहेबांनी आताच मला सांगितले की अशा प्रकारचा कार्यक्रम कधी झाला नाही इकडे. अशा कार्यक्रम आमच्यासाठी होतो आहे याचा आनंद आहे. तुम्हा सर्वांना पाहून आम्हाला आनंद झाला आहे. काल मुंबईत आम्ही जे पाहिले ते सर्वांसाठी स्वप्न होते. आमचे स्वप्न होते की वर्ल्डकप भारतात आणायचा होता. ११ वर्ष आम्ही थांबलो होतो वर्ल्डकपसाठी. मी संघातील सहकाऱ्यांचा आभारी आहे. हे माझ्यामुळे किंवा सूर्या किंवा शिवम किंवा यशस्वीमुळे झाले नाही. मी लकी देखील आहे की मला जी टीम भेटली ती जबरदस्त होती. प्रत्येक सामन्यात सर्वांनी योगदान दिले त्यामुळे आपण जिंकलो, असे रोहित म्हणाला.
यावेळी सूर्यकुमार यादवने अस्खलीत मराठीतून विधानसभा आणि परिषदेतील आमदार, कर्मचाऱ्यांसमोर भाषण केले. मुख्यमंत्र्यांचे धन्यवाद मला इथे बोलायची संधी दिली. जे मी काल बघितले ते मी विसरू शकत नाही. आज जे पाहतोय ते देखील मी कधी विसरू शकत नाही. मी काय बोलू, माझे शब्द संपले. कॅच बसला हातात. कसा असा असे म्हणत सूर्याने अॅक्शन करून दाखविली. मुंबई पोलिसांनी काल जे केले ते इतर कोणाही करू शकत नाही. आपण आणखी एक वर्ल्ड कप जिंकू, असे आश्वासनही सूर्याने विधानसभेतून दिले. महत्वाचे म्हणजे सूर्याने हे सर्व अस्खलित मराठीतून सांगितले.
गुरुवारच्या जंगी सोहळ्यानंतर शुक्रवारी मुंबईकर खेळाडू असलेले कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल या चौघांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी सत्कार झाला. कर्णधार रोहित शर्मा, फलंदाज सूर्यकुमार यादव, अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे यांनी वर्ल्डकपमध्ये भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर युवा यशस्वी जैस्वाल याचाही संघात समावेश होता. या चार खेळाडूंनी शुक्रवारी दुपारी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत वर्ल्ड चॅम्पियन्सचा सत्कार करण्यात आला.
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…