
तिन्ही गाड्यांचा चक्काचूर; एकाचा जागीच मृत्यू
पुणे : सध्या अनेक मार्गांवर मोकळा रस्ता दिसताच वाहनचालक बेशिस्तपणे वाहने चालवताना दिसून येतात. अशा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मात्र तरीही वाहनचालक कोणत्याही सूचनांचे पालन न करता सुसाट वेगाने वाहने चालवत आहेत. सध्या महाराष्ट्रात अपघाताचे सत्र वाढत असतानाच आज सकाळी मुंबई - पुणे एक्सप्रेसवर (Mumbai Pune Expressway) भीषण अपघात (Accident) झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघातामध्ये तीन वाहने एकमेकांना जोरदार धडकल्याने हा अपघात झाला. यामध्ये तिन्ही वाहनांचा चक्काचूर झाला असून एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई - पुणे एक्सप्रेसवर आज सकाळी सातच्या सुमारास महामार्गावरील नवीन बोगद्याजवळ भीषण अपघात झाला. यामध्ये कंटेनर वाहन, गॅस टँकर आणि गाडी एकमेकांना आदळल्यामुळे अपघात झाला. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून अन्य जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल होत मृताला खोपोली येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, अपघातानंतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. अक्षय ढेले (३०) असे मृत चालकाचे नाव आहे. या घटनेनंतर कंटेनरचालक फरार झाला असून सध्या पोलिसांकडून त्याचा कडक शोध घेतला जात आहे. अशा बेशिस्त वाहनचालकांमुळे महामार्गावरून प्रवास करणे धोक्याचे बनले आहे.