Sunday, July 7, 2024
Homeक्रीडाT20 World cup : विश्वविजेत्या टीम इंडियाला प्रत्यक्ष पाहायचंय? मग 'या' वेळेपूर्वी...

T20 World cup : विश्वविजेत्या टीम इंडियाला प्रत्यक्ष पाहायचंय? मग ‘या’ वेळेपूर्वी मरीन ड्राईव्हला पोहोचा!

नरिमन पॉईंटपासून वानखेडे स्टेडिअमपर्यंत निघणार ओपन बसमधून मिरवणूक

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket team) तब्बल १३ वर्षांनंतर टी-२० वर्ल्डकप २०२४ (T20 world cup 2024) जिंकल्यामुळे देशभरात आनंदाची लाट उसळली आहे. यानंतर आज टीम इंडिया रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात बार्बाडोस येथून मायदेशात परतली आहे. आज पहाटे टीम दिल्ली विमानतळावर (Delhi Airport) दाखल झाली. यानंतर ते आज ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत ब्रेकफास्ट करणार आहेत. त्यानंतर टीम इंडिया मुंबईत दाखल होणार आहे. त्यांना पाहण्यासाठी चाहते आधीच उत्सुक झाले आहेत. मुंबईमध्ये टीम इंडियाची नरिमन पॉईंटपासून वानखेडे स्टेडिअमपर्यंत (Nariman point to Wankhede stadium) ओपन बसमधून मिरवणूक काढली जाणार आहे. ही मिरवणूक पाहायची असेल तर मुंबईकरांना ‘या’ वेळेच्या आत मरीन ड्राईव्हला (Marine drive) पोहोचावं लागणार आहे.

ओपन बसमधून टीम इंडियाच्या मिरवणुकीसाठी मुंबई पोलीस (Mumbai police) सज्ज आहे. सुरक्षेची कडेकोट व्यवस्था करण्यात आली आहे. वानखेडे स्टेडियमसह शोभायात्रेच्या मार्गावर चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. या शोभयात्रेनिमित्त पाच हजारांहून अधिक पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. त्याशिवाय वाहतूक मार्गातही काही बदल करण्यात आले आहेत. शोभायात्रेच्या पार्श्वभूमीवर एन.एस मार्गाची उत्तर व दक्षिण वाहिनी एनसीपीए ते मेघदूत पुलापर्यंत वाहतूक बंद करण्यात येणार आहे.

२००७ मध्ये पहिला टी-२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जगज्जेत्या टीम इंडियाच्या खेळाडूंची मुंबईमध्ये ओपन बसमधून जंगी मिरवणूक निघाली होती. तब्बल आठ तास चाललेल्या विश्वविजयी मिरवणूक संघाचे स्वागत करण्यासाठी लाखो मुंबईकर रस्त्यावर उतरले होते. आता पुन्हा एकदा भारताने टी २० विश्वचषकावर नाव कोरलेय. विश्वविजेत्यांचे जंगी स्वागत करण्यासाठी पुन्हा एकदा मुंबईकर सज्ज झाले आहेत.

वाहतूक मार्गात कोणते बदल?

वीर नरीमन रोड चर्चगेटपासून किलाचंद चौकपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. याशिवाय दिनशॉ वाच्छा मार्ग डब्ल्यू आय.ए चौकपासून रतनलाल बुबनाचौकापर्यंत वाहतुक बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच हुतात्मा चौकापासून वेणूताई चव्हाण चौकापर्यंत मादाम कामा रोड बंद ठेवण्यात येणार आहे. बॅरिस्टर रजनी पटेल मार्ग व विनय शहा मार्गही वाहतुकींसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी वाहतुक पोलिसांनी पर्यायी मार्गांचे नियोजन केले आहेत.

कोस्टल मार्ग सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. वरील सर्व मार्गांवर वाहने उभी करण्यास रुग्णावाहिका, पोलिसांची वाहने, अग्निशमन दल व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची वाहने वगळता इतर वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

किती वाजता पोहोचावं लागेल?

शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी ४:३० वाजण्यापूर्वी मरीन ड्राईव्ह येथे सहभागी व्हावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. वानखेडे स्टेडिअमच्या आतही विजयी शोभायात्रा होणार आहे. त्यासाठी चाहत्यांनी सहा वाजण्याच्या आत वानखडे स्टेडिअममध्ये प्रवेश करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलेय. कार्यक्रमासाठी येणाऱ्या चाहत्यांनी रेल्वेने प्रवास करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

नवतारे

मैफल

- Advertisment -