पर्यटक वाहून जाण्याच्या घटनांनंतर सर्वच ठिकाणचे जिल्हाप्रशासन अलर्ट मोडवर
ठाणे : गेल्या काही दिवसांत पावसाळी पर्यटनासाठी (Monsoon tourism) गेलेल्या पर्यटकांचा जोरदार पाण्याच्या प्रवाहात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या. लोणावळ्याच्या भुशी डॅममध्ये (Lonavla Bhushi dam) तर एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याने सर्वत्र खळबळ उडाली. या घटनांनंतर राज्य सरकारने संध्याकाळी सहा नंतर पर्यटनस्थळांवर जाण्यास बंदी घातली. त्यासोबतच आता सर्वच ठिकाणचे जिल्हाप्रशासन देखील अलर्ट मोडवर आले आहे. पुण्यानंतर आता ठाणे जिल्ह्यातील (Thane District) पावसाळी पर्यटनस्थळांवर मनाई आदेश लागू करण्यात आले आहे.
अंबरनाथच्या तहसीलदार प्रशांती माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातील धबधबे, नदी आणि धरण परिसरात जाण्यास पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. भुशी डॅमसारखी दुर्घटना टाळण्यासाठी ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहेत. कलम १४४ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ३४ अन्वये हे आदेश लागू करण्यात आले आहेत. हे मनाई आदेश पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी लागू करण्यात आले असून त्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रशांती माने यांनी दिली.
कोणत्या पर्यटनस्थळांवर असणार बंदी?
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील कोंडेश्वर धबधबा, भोज नदी, दहिवली नदी, आंबेशिव नदी, चंदेरी गड, चांदप, आस्नोली नदी, बारवी नदीवर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. कल्याण तालुक्यातल्या कांबा, पावशेपाडा, खडवली नदी, टिटवाळा नदी, गणेश घाटावर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. मुरबाड तालुक्यातील सिद्धगड, डोंगरन्हावे, सोनाळे, हरिश्चंद्रगड, बारवी धरण परिसर, पडाळे धरण, माळशेज घाट, नाणेघाट, गोरखगडवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी नदी परिसर आणि शहापूर तालुक्यातील भातसा धरण आणि परिसर, माहुली किल्ला आणि पायथा, अशोक धबधबा, आजा पर्वत, सापगाव नदी किनारा, कळंबे नदी, कसारा घाट आणि कसारा घाटातील धबधबे या पर्यटन स्थळांवर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.